अखेर कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला! ५ मे रोजी बैठकीचे आयोजन जलसंपदा विभागाचा सूत्रांची माहिती
By : Polticalface Team ,02-05-2025
नंदकुमार कुरुमकर
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा; पारनेर; कर्जत; आणि करमाळा या चार तालुक्यांना वरदान ठरलेला कुकडी कालव्याचे उन्हाळी हंगामासाठी आवर्तनासंदर्भात अखेर कालवा सल्लागार समितीचा मुहूर्त ठरला. आवर्तन सोडणे संदर्भात कालवा सल्लागार समितीची ५ मे रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या एका सूत्रांनी दिली.
दरम्यान उन्हाची तीव्रता अत्यंत भीषण आहे. त्यामध्ये आहे; त्या पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. अशा परिस्थितीत कुकडी लाभ क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला गेला आहे. या लाभक्षेत्रात हंडाभर पाण्यासाठी सर्वांनाच भटकंतीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामध्ये कुकडी लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामासाठी कुकडीचे आवर्तन सोडताना या आवर्तनाला मोठा विलंब लागला गेला आहे. या कुकडी लाभ क्षेत्रातील पाणी प्रश्नाचे दुर्भिक्ष उन्हाळी हंगामातील शेती पिकांचे भविष्य या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी मागील आठवड्यात कुकडीचे उन्हाळी हंगामाबाबत आवर्तनाला मुहूर्त मिळेना. याबाबत जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाचे प्रखर लेखणीच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते. त्यामुळे या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाला जागा आली आहे. आता तातडीने कुकडीच्या आवर्तनासंदर्भात कालवा सल्लागार समितीची अहिल्यानगर येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
* कुकडी लाभक्षेत्रात वास्तविक पाहता श्रीगोंदा; पारनेर; कर्जत; करमाळा इत्यादी तालुक्यांची मोठी शेतजमीन ओलिताखाली येते. या शेतजमिनीला पाऊस आणि कुकडीच्या पाण्याच्या धर्तीवरच शेतकऱ्यांना पिके काढावी लागतात. त्यामध्ये या लाभक्षेत्रात फळबागांची संख्या देखील मोठी आहे. या फळबागांना ऐन उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत शेतकरी कुकडीच्या उन्हाळी हंगामातील आवर्तनावर भरवसा ठेवतात. वर्षानुवर्षे जतन केलेल्या फळबागा जगल्या पाहिजे. याबाबत शेतकऱ्यांची पाण्यासाठी मोठी धडपड असते. परंतु कुकडीचे रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन प्रत्येक वर्षी कोलमडते. असा आरोप देखील शेतकऱ्यांमधून वारंवार होताना दिसतो. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुकडी कालव्यावर आठमाही धोरणाचा समावेश आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आठ महिने धर्मानुसार आवर्तन सोडले जात नाही असा आरोप या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना कुकडीचे उन्हाळी हंगामात एक व रब्बी हंगामात साधारणता दोन आवर्तने मिळतात. परंतु त्याही पाण्याला प्रतीक्षा करावी लागते. या आवर्तनाचा फॉर्मुला देखील टेल टू हेड असल्याने श्रीगोंदा; कर्जत; पारनेर इत्यादी तालुक्यांना करमाळ्याची भरणी झाल्यानंतर आवर्तन सोडले जातात. तोपर्यंत उन्हाळी हंगामात पाऊस आणि कुकडीचे पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके फळबागा जळून गेल्यानंतर कुकडीचे पाणी सोडण्यात येते. हा अनुभव शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून पाहिला. श्रीगोंदाच्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन दोन महिन्यापूर्वी सोडण्यात आले. परंतु त्या आवर्तनात फक्त शेतकऱ्यांचे पाटच ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या आवर्तनात फक्त शेतकऱ्यांना सहा दिवसाचा अल्टिमेटन देण्यात आला होता. त्यामुळे अनेक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहिल्याचा आरोप देखील संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता. शेतकऱ्यांना कुकडी लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगामासाठी हक्काचे पाणी जलसंपदा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अक्षरशा अश्रू आणण्यासारखे ठरले. दरम्यान आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आवर्तन नेमके? पिण्याच्या पाण्यासाठी की शेतीसाठी सोडणार? याबाबत पाच मे रोजी बैठकीत ठरणार आहे. सद्यस्थितीला कुकडीच्या धरणांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी असल्याचे सांगितले जाते. मग पावसाळ्यामध्ये कुकडीची समाधानकारक धरणे भरले असताना हे पाणी नेमके गेले कुठे? असा संवाद देखील कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. चारही तालुक्यांना पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाला पिंपळगाव जोगेतून येडगावच्या धरणात साधारणता साडेचार टीएमसीच्या पुढे पाणी सोडावे लागणार आहे. तरच चारही तालुक्यांची पाण्याची तहान भागणार आहे. असे देखील शेतकऱ्यांमधून तर्क व्यक्त करण्यात येत आहे याबाबत या चारही तालुक्यातील लोकप्रतिनिधी व खासदार कोणती भूमिका घेतात याकडे आता कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक :