By : Polticalface Team ,17-09-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय पितृ सेवा करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे भावनिक उद्गार ह भ प सोमनाथ महाराज बारगळ यांनी आयोजित कीर्तन सेवेत व्यक्त केले.
नागवडे कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार दिवंगत मारुती वाल्हेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त सोमनाथ महाराज बारगळ यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित भाविकांना भावनिक सल्ला देताना बारगळ महाराज पुढे म्हणाले की; प्रथम वर्ष श्राद्ध म्हटले की; त्या मृत आत्म्याचा मुक्ती दिन समजला जातो. तो हिंदू धर्मानुसार सर्वात श्रेष्ठ पर्वकाळ समजला जातो. संसारी माणसाने देव देवतांसह पितृदेवाला विसरता कामा नये किमान आपल्या कुटुंबीयांतील तीन पिढ्यांपर्यंत मानपान ठेवला पाहिजे. घरातील पितृ हरपले असले तरी त्याचे लक्ष संपूर्ण आपल्या परिवाराकडे असते. असे शास्त्र सांगते असे देखील बारगळ महाराज यांनी आवर्जून सांगितले.
आणखी पुढे बोलताना बारगळ महाराज म्हणाले की; माणूस गेला म्हणून सर्वकाही संपले असे कोणीही समजू नये. म्हणूनच पितृदोष मागे लागतो. याची जाणीव सर्वांनाच हवी. म्हणूनच पितृसेवा म्हणजे भगवंताची सेवा समजली जाते. त्यामुळे घरातील व्यक्ती मृत पावल्यास त्यांचा विसर होता कामा नये. दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे. जोपर्यंत अज्ञान असाल तर सुज्ञानी माणसाकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. अंत्यविधी हा सोळा संस्कार विधी समजला जातो. ज्यांनी जन्माचा सोहळा केला त्याचा अंत्यविधीला सोहळा घालावाच लागतो. त्यासाठी जीवनामध्ये प्रत्येकाने मनोभावे भक्ती करत भगवंतांचे चिंतन; नामस्मरण व भगवंताला शरण जायला हवे; त्यातून आपल्या जीवनाचे हित व सोने करावे; बारगळ महाराज आणखी पुढे म्हणतात की; मानवाला परत परत हा जन्म मिळत नाही. हरीनामात खरी ताकद आहे. जन्म दिलेला आहे तो वाया जाऊ देऊ नका; सर्व जन्मांमध्ये मानवाचा सर्वश्रेष्ठ जन्म आहे; असे सांगून बारगळ महाराज यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या सोहळ्यास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे संचालक सुभाषराव शिंदे विठ्ठलराव जंगले राकेश पाचपुते भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुरुमकर व्हाईस चेअरमन मधुकर होले लक्ष्मण भोईटे दादाजी घोंडगे सर सिद्धेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन प्रवीण कुरुमकर जयसिंग शेंडे रवींद्र भोंडवे सर ईश्वर रेवगे सर आदींसह लिंपणगाव पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता सूत्रसंचालन दादा कुरुमकर यांनी केले