राज्यपालांकडून हुतात्म्यांचाही अपमान, चप्पल घालून शहिदांना आदरांजली
By : Polticalface Team ,27-11-2022
मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीच वादात सापडलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी आता शहीदांचा अपमान केला आहे. मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली. पण यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून आदरांजली वाहिली. यामुळे हा शहिदांचा अपमान नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांसह इतरही जवान शहीद झाले होते. तसेच अनेक निष्पाप नागरिक ठार झाले होते. मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील पोलीस स्मारकच्या ठिकाणी शहीदांना आज आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांना आदरांजली वाहण्यापूर्वी पायातील पादत्राणे काढली. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायातील चप्पल काढली नाही. चप्पल घालूनच राज्यपाल कोश्यारी यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. यामुळे राज्यपालांच्या या कृतीवर आता टीका होत आहे. राज्यपालांनी शहीदांचा अपमान केला आहे, अशी टीका केली जात आहे. राज्यपाल कोश्यारींच्या आजच्या एका कृतीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे
वाचक क्रमांक :