By : Polticalface Team ,17-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाजार या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते साडेदहा वाजेपर्यंत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तर शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी भविष्यात दैनंदिन जीवनात व्यवहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी आनंदी बाजार भरवत विविध शालेय वस्तू, स्वादिष्ट मिठाई, विविध प्रकारच्या भाजीपाला इत्यादी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पुढे उत्तम व्यवसायासाठी व्यावहारिक ज्ञान मिळावे त्यातून पुढे स्वतःच्या पायावर उभे राहुल आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी हा हेतू विद्यालयाच्या प्रशासनाने समोर ठेवला होता. व आर्थिक देवाणघेवाण बाजारामध्ये कशाप्रकारे चालते त्यातून नफा कसा मिळवता येतो हा हेतू असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले या आनंदी बाजारामध्ये शालेय विद्यार्थी तसेच बाह्य विद्यार्थी, पालक यांनी देखील या आनंदी बाजारचा आनंद घेतला. व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विद्यालयाच्या या शानदार उपक्रमाबद्दल नागवडे कारखान्याचे संचालक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष डी आर काकडे यांच्यासह सर्व स्कूल कमिटीच्या सदस्यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अत्यंत उत्साही वातावरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते पृथ्वीराज बाबा नागवडे हे होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री नागवडे पुढे म्हणाले की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. त्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बापूंच्या या दूरदृष्टी मुळेच उच्च शिक्षित होऊन उच्चपदस्थ व उद्योजक बनले गेले आहेत. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की विद्यालयाने जो शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेली कला अवगत होण्यासाठी स्नेहसंमेलन हा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना त्यातून निश्चितच मोठी ऊर्जा प्राप्त होते. स्नेहसंमेलन सारखे विद्यालयांमध्ये भविष्यातही पुढे अशाप्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे असून ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या आपल्या अंगी असलेल्या कलेपासून वंचित राहता कामा नये असे सांगून या स्नेहसंमेलन कार्यक्रमास श्री नागवडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मराठमोळी गाणी, पोवाडे, कवाली, नाट्य अभिनय, जुन्या जाणकार कलाकारांची गाणी, एकपात्री नाटक अशा विविध कला अवगत करत विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सदरचा कार्यक्रम हा अत्यंत शांततापूर्ण व आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे, राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, सरपंच मनीषाताई नहाटा, उपसरपंच हनुमंत मगर, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली मगर, माजी संचालक दिलीपराव काकडे, विलासराव काकडे, पुरुषोत्तम लगड, मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे, एम आर पवार, गणेश काकडे, राहुल गोरखे, बंडू खंडागळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षिका अस्मिता वाबळे मॅडम, यांनी केले. निवेदिका म्हणून ऋतुजा कांडेकर व प्रतीक्षा साळवे यांनी काम पाहिले. तर विद्यालयाचे कलाशिक्षक अभिषेक उदमले व श्रीमती नौशाद शेख यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार न करता अत्यंत शांततापूर्ण वातावरणात स्नेहसंमेलन पार पडले. तर उपस्थित प्रेक्षकांचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :