नादुरुस्त रस्त्याचा पाठपुरावा करूनही लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट रस्ता दुर्लक्षित?
By : Polticalface Team ,28-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, याकडे अधिकाऱ्यांनी मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवासी वाहन चालकांमधून या प्रश्नासंदर्भात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान प्रवासी व वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता गेल्या दोन वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असून, या रस्त्याची कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या मार्गावर सहकारी साखर कारखानदारी असल्याने सभासद ऊस उत्पादक कामगार यांची नेहमीच रस्त्यातून गाळप हंगामात वर्दळ असते. वाहन चालकांचे म्हणण्यानुसार लिंपणगावपासून ते नागवडे कारखाना रेल्वे गेट पर्यंत पूर्णतः रस्ता खड्डेमय बनल्याने ऊस वाहतूक करणारी बैलगाड्या व अवजड वाहने या रस्त्यातून मार्गस्थ होताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. त्याबरोबरच ऊस बैलगाडी चालकांना देखील बैलांचा खड्ड्यात पाय गेल्यानंतर त्या बैलांना देखील मोठी दुखापत होताना दिसते. तर प्रवाशांच्या म्हणण्यानुसार लिंपणगावच्या ग्रामस्थांनी या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभाग श्रीगोंदा पंचायत समितीच्या उपअभियंता यांना वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करूनही प्रत्येक वेळेस रस्ता दुरुस्तीच्या निधीची कमतरता अधिकाऱ्यांकडून दाखवण्यात येत आहे. हे कारण गेल्या अनेक वर्षापासून अधिकारी पुढे करतात हे योग्य नाही, असा आरोपही प्रवासी वर्गातून केला जात आहे. तर या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठीची विनंती देखील वारंवार ग्रामस्थांनी केली होती. परंतु त्याची देखील संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. या पाठीमागे या अधिकाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे याचाही शोध ग्रामस्थांमधून घेतला जात आहे. वास्तविक पाहता हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे समाविष्ट आहे, असे असताना देखील या रस्त्याची अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची डागडुजी व खड्डे देखील बुजवले गेले नाहीत, असा आरोप प्रवासी व वाहनचालकांमधून केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी हे मार्च अखेर तालुक्यातील गावोगावी ग्रामपंचायत मार्फत विविध बांधकामांच्या कामात व्यस्त असल्याचे समजते. कारण तेथे त्या बांधकामामध्ये चिरीमिरी मिळत असल्याने या महत्त्वाच्या रस्त्याकडे मात्र अधिकारी ढुंकूनही पाहत नाही. असा आरोपही ग्रामस्थांमधून केला जात आहे सद्यस्थितीला साखर कारखान्याचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या नादुरुस्त रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी मुरूम देखील टाकलेला नाही. त्यामुळे चालू वर्षी गाळप हंगामात या रस्त्यातून मार्गस्थ होताना प्रवासी वाहन चालकांना आपला जीव मोठे धरूनच साखर कारखान्यापर्यंत ऊस गाळपासाठी घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. असे देखील एका वाहनचालकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर रस्ते कामाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.
लिंपणगावच्या ग्रामस्थांनी या नादुरुस्त रस्त्या संदर्भात रस्ता रोकोचा इशारा देखील देण्यात आल्याचे समजते. परंतु शेतकऱ्यांचे व ऊस उत्पादकांचे ऊस वेळेत जाणे तितकेच महत्त्वाचे असल्याने काही प्रतिष्ठित ग्रामस्थांनी या संदर्भात सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांविरोधात रस्ता रोको आंदोलनाचा संघर्ष टाळला गेला. हे देखील अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे. उन्हाळी हंगामात या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास या नादुरुस्त रस्त्यासंदर्भात तीव्र आंदोलनाचा निर्णय देखील घेतला असल्याचे लिंपणगावच्या ग्रामस्थांकडून समजले.
वाचक क्रमांक :