श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
By : Polticalface Team ,27-05-2025
नंदकुमार कुरुमकर
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़ुशी; कही गम अशी स्थिती निर्माण झालेली असून गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने मोठे थैमान घातले आहे. सोमवारी काही तासच पावसाने सूर्यदर्शन देत उघडीप दिली त्यामध्ये काही तास कडक ऊन देखील पडले. परंतु पुन्हा आकाश भरून आले. आणि पावसाने जोर धरला. पुन्हा दिवसभर ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झाला. प्रामुख्याने श्रीगोंदा तालुक्यात कृषी विभागाची 8 मंडल कार्यालय असून; यामध्ये तालुक्यात एकूण 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शशिकांत गांगर्डे यांनी दिली. दरम्यान अवकाळी पाऊस काही थांबण्याच्या मार्गावर नाही. दिवसभर पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन मात्र मोठ्या प्रमाणात विस्कळीत होताना दिसले. या अति पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मात्र मोठा प्रश्न गंभीर बनला. शेतामध्ये चारा असून केवळ जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देता आला नाही. त्यामुळे जनावरांची देखील मोठी उपासमार होताना दिसली. दोन दिवसाच्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामासाठी मशागती करून ठेवलेल्या जमिनीत सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अवकाळीचा पाऊस हा जोराचा व काही प्रमाणात संतधार सर्वत्र होत असल्याने तापलेली जमीन मात्र या पावसामुळे थंड झाली आहे. त्यामुळे हवेत देखील मोठा गारव निर्माण झाला असून; या सततच्या पावसाने सर्वांनाच हुडहुडी भरल्याचे बोलले जात आहे. या ढगाळ व थंड हवेमुळे सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येताना दिसत आहे. या वातावरणामुळे थंडी तापाच्या रुग्णात देखील मोठी वाढ होताना दिसली. या अवकाळी पावसामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची मात्र मोठी धांदल उडाल्याची दिसते. अनेक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शेतात वळईला टाकल्याचे दिसते. गेल्या चार-पाच दिवसाच्या पावसामुळे झाकलेला कांदा उघडा करण्यासाठी पाऊस साथ देत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा वळईला टाकलेला कांदा खराब झाल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले. त्यामुळे या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्याचा दावा देखील कांदा उत्पादकांमधून केला जात आहे.
सद्यस्थितीला कांद्याचे भाव कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्यावर्षी कांद्याला उच्चांकी भाव मिळाल्यामुळे यावर्षी कांदा उत्पादकांनी कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले. परंतु गेल्या दोन महिन्यापासून कांद्याचे भाव अत्यंत कोसळल्यामुळे कांदा उत्पादकांची विविध घोर निराशा झालेली आहे. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना वखारी करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसल्याने काटनी करून ठेवलेला कांदा आद्यपही शेतातच कागदाने झाकलेला आहे. पाऊस उघडला तर कांदा उघड्यावर ठेवता जातो. पाऊस आला तर ताबडतोब कांदा झाकण्याची धावपळ सध्या शेतकऱ्यांची सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस मात्र उघडीप द्यायला तयार नाही. अनेक शेतातील झाकलेल्या कांदा देखील खराब होऊ लागला आहे. कांद्यातून मिळणारे उत्पन्न देखील अवकाळी ने हिरावून घेतल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले हे कांद्याचे पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट होण्याचे मार्गावर आलेले असून; शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र आता अश्रूंच्या धारा दिसून येत आहेत. अशी स्थिती कांदा उत्पादकांची निर्माण झाल्याचे दिसते.
* खरीप हंगामाबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना तात्काळ मार्गदर्शन करावे
* सद्यस्थितीला खरीप हंगाम मोसम आता सुरू होतं आहे. त्या दृष्टीने शेतकरी खरिपाची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. अनुक्रमे कपाशी; बाजरी; मका; सोयाबीन; उडीद इत्यादींच्या या खरीप हंगामात पेरणी करतात. परंतु गेल्या आठ दिवसापासून पावसाने जोर धरल्यामुळे शेतात तुडुंब पाणी साचले आहे. सर्वत्र ओढून आले बंधारे देखील भरलेले आहेत. त्यामध्ये पाऊस असाच सरू राहिला तर खरीप हंगाम किमान महिनाभर लांबणीवर जाऊ शकतो असा तर्क शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात असून; खरीप हंगामाबाबत आता कृषी विभागाने तात्काळ कृषी सहाय्यकांमार्फत खरीप हंगामाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी; बोगस बियाण्यांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी कुठे तक्रार करायची; कोणते उत्कृष्ट बियाणे खरेदी करावे; कोणत्या दिवशी पेरणी करावी. याबाबत गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्याची अपेक्षा अल्पभूधारक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात असून; तालुका कृषी अधिकारी यांनी याबाबत शेतकऱ्यांना खरीप हंगामा विषयी सखोल मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वाचक क्रमांक :