By : Polticalface Team ,30-05-2025
श्रीगोंदा (प्रतिनिधी):श्रीगोंदा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रमुख नेत्यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने, सामान्य जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. नेते सोयीनुसार पक्ष बदलतात, आणि विचारधारा मात्र वेशीवर टांगली जाते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, कुकडी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार राहुल जगताप आणि श्रीगोंदा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी नुकताच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नेते भगवानराव पाचपुते, आणि दोन्ही कारखान्यांचे संचालक उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून या प्रवेशाची चर्चा सुरु होती, आणि ती आज (२८ मे) मुंबईतल्या कार्यक्रमात वास्तवात उतरली. या प्रवेशामुळे अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस गटाला श्रीगोंदा तालुक्यात मोठे बळ मिळाले आहे. यापूर्वीही घनश्याम व अण्णासाहेब शेलार यांचा पक्षप्रवेश झाल्याने, हा तालुका आता जवळपास अजित दादांच्या वर्चस्वाखाली गेला आहे.
मात्र या घडामोडींनी स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ निर्माण केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच समीकरणं झपाट्याने बदलल्याने, निवडणुका चुरशीच्या होणार, हे निश्चित मानले जात आहे.
वाचक क्रमांक :