५ वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू; अरुंद रस्त्यामुळे गमवावा लागला जीव
By : Polticalface Team ,Fri Apr 22 2022 22:20:04 GMT+0530 (India Standard Time)
बीड जिल्हा प्रतिनिधी:- बाळराजे जाधव
केजकडून माजलगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर टायरखाली येऊन शिवराज लक्ष्मण सुरवसे या पाच वर्षीय बालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धारूर बस डेपोच्या समोर शुक्रवारी (दि.22) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना केवळ अरुंद रस्त्यामुळे झाली आहे. मागील चार वर्षात खामगाव पंढरपूर या महामार्गाच्या धारूर घाटातील अरुंद रस्त्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. तरी अद्यापही रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
अशी घटना घडली
येथील बस डेपोच्या समोरासमोर केजकडून माजलगावकडे जाणाऱ्या दोन ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरखाली (एम एच 44 डी 1908) शिवराज सुरवसे हा पाच वर्षीय बालक आल्याने ही दुर्घटना घडली. सदरील घटना घडल्यानंतर पाच वर्षीय बालक ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरखाली अडकून पडल्याने जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर उचलून मृत बालकाचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पुढील कारवाई केली. ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
झालेली घटना खामगाव पंढरपूर या महामार्गावर धारूर घाटाच्या जवळील अरुंद रस्त्यावर झाली आहे. चार वर्षांपूर्वी तयार झालेल्या या महामार्गवर 11 किमी अरुंद रस्ता ठेवण्यात आल्याने सतत अपघाताची मालिका घडत असते. वेळोवेळी निवेदन देऊन रस्ता रुंदीकरणाची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे. पाच वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यूला रस्त्याचे अरुंदीकरण कारणीभूत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रक्रिया येत आहे.
वाचक क्रमांक :