By : Polticalface Team ,23-01-2023
करमाळा(प्रतिनिधी) अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60:- ग्रामीण विकास केंद्र, निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांना गंगाई - बाबाजी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सूप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गंगाई-बाबाजी सांस्कृतिक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भिमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित गंगाई-बाबाजी महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सौ. दमयंती ताई धोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. अजय दादा धोंडे, पाटोदा पंचायत समिततीच्या सभापती सौ. सुवर्णा ताई लांबरुट, ज्येष्ठ संचालक विठ्ठल अण्णा बनसोडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, ह. भ. प.आंधळे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ७ वर्षांपूर्वी जामखेड येथे अनाथ, निराधार, वंचित, गोर गरीब, भटके विमुक्त, आदिवासी, ऊसतोडणी कामगार, विट भट्टी कामगार, व लोक कलावंतांच्या मुलां मुलींसाठी निवारा बालगृहाची स्थापना केली. सध्या जामखेड पासून ७ किमी अंतरावर मोहा फाटा येथील समता भूमीवर २ मजली इमारती मध्ये निवारा बालगृह चालविले जाते. सध्या तेथे पहिली ते दहावी पर्यंत शिकणारी ७० मुले मुली निवासी शिक्षण घेत आहेत. देणगी, लोक वर्गणी, वस्तुरुपी व आर्थिक स्वरूपातील मदतीतून निवारा बाल गृह चालविले जाते. या बालगृहास महिला व बाल कल्याण विभागाची मान्यता असून त्याला कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही. तर समाजातील दानशूर व्यक्ती व काही कंपन्यांच्या मदतीतून हे बालगृह चालविले जाते.
ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या वतीने समता भूमीवर सध्या विधवा, परित्यक्ता, व एकल महिलांसाठी माय लेकरू हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प अकराला येत आहे. संस्थेच्या वतीने मुंबईतील कोरो या संस्थेच्या सहकार्यातून आदिवासी व भटके विमुक्त महिला सक्षमीकरण, सबलीकरण उपक्रम राबविला जातो त्याच बरोबर महिला तक्रार निवारण केंद्र देखील चालवले जाते. जामखेड, कर्जत व श्रीगोंदा या ३ तालुक्यात हा प्रकल्प चालू असून संस्थेने गेल्या २५ वर्षांत आदिवासी व भटके विमुक्तांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.