By : Polticalface Team ,31-03-2023
नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांची काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ढोकराई येथे तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना माजी मंत्री थोरात पुढे म्हणाले की ,श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू हे अखेरच्या श्वासापर्यतग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काँग्रेस वाढवण्याचे काम केले. स्व. बापूनीं सर्वसामान्यांच्या हितासाठी श्रीगोंदा तालुक्यात संपूर्ण आयुष्यात सहकार, शिक्षण, सिंचन क्षेत्रात भरीव योगदान देत तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. सहकारातून श्रीगोंदा तालुका हा समृद्धीकडे नेला. अखेरच्या श्वासापर्यंत बापूंनी कठोर परिश्रम घेऊन तालुका सुजलाम सुफलाम केला. सहकार महर्षी बापूंनी राज्यातील सर्वच धुरंधर नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले. असे सांगून ते पुढे म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा तितका सोपा तालुका नव्हे, तरीदेखील बापूंनी जोमाने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्याला वैभव प्राप्त करून दिले. तोच वारसा त्यांचे सुपुत्र राजेंद्र नागवडे व अनुराधाताई नागवडे हे बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तालुक्यात अहोरात्र विकासाचा ध्यास घेत काँग्रेसचे विचारधारा समोर ठेवून काम करत आहेत. काँग्रेस पक्षाने देखील त्यांच्या कार्याची दखल म्हणून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांना काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सौ अनुराधाताई नागवडे ह्या देखील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे काम पाहत आहे. निश्चितच आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला उज्वल भविष्य आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी नागवडे निश्चितच यशस्वी होतील, आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नागवडेंना उमेदवारी देण्यासाठी आग्रही राहू, असे सांगून थोरात आणखी पुढे म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकरी धोरणाविरुद्ध आहे. महागाई, बेरोजगारी या प्रश्नावर मात्र पंतप्रधान कधीच बोलत नाहीत. सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारला फटकारले आहे. आता वारे बदलले असून कर्नाटक विधानसभेचा एक्झिट पोल ने हे देखील सिद्ध केले आहे. राहुल गांधींवर देखील आकसापोटी कारवाई केली जाते. भाजप सरकार बनवाबनवीचे राजकारण करत असून, कार्यकर्त्यांनी देखील आता काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे सांगून नागवडे यांना थोरात यांनी पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यावेळी म्हणाले की, स्वर्गीय बापूंनी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कष्टकरी शेतकऱ्यांवर हा पार प्रेम करून एक विकासाची दिशा दिली. त्यामुळे नागवडे कुटुंब आणि सर्वसामान्य शेतकरी असे ऋणानुबंधाचे नाते संपूर्ण जिल्ह्यात दिसून येते. पुणे कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एक संघ ठेवण्याचे काम केले. श्रीगोंदा तालुक्याचा सर्वांगीण विकास करत तालुका सर्वच क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने आघाडीवर ठेवला. त्यांचाच वारसा राजेंद्र नागवडे व अनुराधाताई नागवडे हे हे निश्चितपणे नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करतील, असे सांगून या दोन्हीही आमदार महोदयांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र नागवडे यांना भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना नूतन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. स्वर्गीय बापूंनी देखील श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम पार पाडले. सहकाराच्या माध्यमातून स्वर्गीय बापूंनी सहकार सिंचन शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत पायाभरणी करून कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम केले. सद्यस्थितीला तालुक्यातील काही नेत्यांनी पवार कुटुंबियांच्या नावाने मते मागून त्यांनाच फसवण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याच्या आगामी विधानसभेसाठी आम्ही महाआघाडीकडून नागवडे कुटुंबीयांच्या अनुराधाताई नागवडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी घेणार असून 2024 ला काँग्रेस पक्षाचाच आमदार विजयी होईल. असे सांगून काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी सोपवली ही सक्षमपणे पार पाडू. काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री नागवडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्यानंतर अनुराधाताई नागवडे व राजेंद्र नागवडे हे सर्व क्षेत्रात उत्तमरीत्या काम पार पाडत आहेत. राज्यात देशमुख -थोरात- नागवडे या घराण्यांचे काँग्रेस पक्षाला राज्यात प्रेरणादायी नेतृत्व लाभले. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एक निष्ठावंत नागवडे यांच्या रूपाने नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे निश्चितच श्रीगोंदा तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याचे सांगितले.
या सत्कार सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार लहू कानडे, आमदार रवींद्र धंगेकर, बाबासाहेब भोस, सौ अनुराधाताई नागवडे, संपतराव म्हस्के, दीपक शेठ नागवडे उत्कर्षा रूपवते, शिवानी माने, शुभांगी पोटे, वीरेंद्र कराड, टिळक भोस, अरुणराव म्हस्के, सौ प्रियांका रणपिसे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सितल वाबळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, अनिल वीर, हेमंत ओगले, प्रशांत ओगले, यांच्यासह नागवडे कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यांनी केले. आभार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल भैया वाबळे यांनी मानले. वाचक क्रमांक :