By : Polticalface Team ,02-04-2023
मढेवडगाव तालुका श्रीगोंदा येथील सेवा संस्थेचे माजी चेअरमन स्व ज्ञानदेवराव शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी रामलिंग देवस्थान शिरूरचे रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज रासकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आपल्या किर्तन रुपी सेवेत बोलताना ह भ प रासकर महाराज पुढे म्हणाले की, मृत्यूनंतर विजय मिळवणे म्हणजे जीवनात सत्कार्य करून कीर्ती मिळवणे हा होय. त्यासाठी जीवनात आपले कर्म योग्य असायला हवे. हे तत्व स्वर्गीय ज्ञानदेवराव शिंदे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात तंतोतंत पाळले. स्वतःच्या मुलावर प्रेम करताना तितकेच इतरांच्या मुलांवर देखील प्रेम आवश्यक आहे. ते प्रेम मग ते कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती असो त्यांच्यावर आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये काकांनी केले. एखाद्याच्या मृत्यूची बातमी कानावर पडली तर निश्चितच दोन थेंब आश्रुवाटे यावेत. यालाच प्रखर भावना व मानवप्रेम म्हणतात. असे सांगून रासकर महाराज पुढे म्हणाले की, तुकोबाराय म्हणतात की, गोड कर्म केल्यानंतर शेवट देखील गोड होतो." शेवट हा माझा बहु गोड झाला" असे मधुर वाणीतून विवेचन करताना राजकारणामध्ये तात्विक मतभेद जरूर असावेत, परंतु मनभेद नसावेत. हेच तत्व ज्ञानदेव काकांनी सर्व क्षेत्रात जोपासले. विरोध हा व्यक्तीचा नसावा तत्त्वाचा असावा. एखाद्याचा संसार जाळीमुळी सहित राजकारणात भरडू नये त्यातून सुडाचे राजकारण निर्माण होते. त्यातूनच खराब विरोध उदयास येतो.
रासकर महाराज आणखी पुढे म्हणाले की, राजकारणातून निवृत्त होताना अध्यात्माची कास धरावी हेच तत्व मढेवडगावच्या शिंदे परिवार जाणले. शिंदे परिवार हे समर्थ प्रेम देणारे कुटुंब आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात या कुटुंबाने अध्यात्मा बरोबर अनेक माणसे जोडली. या परिवाराने राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना टोकाचे राजकारण कधीच केले नाही. त्यासाठी प्रत्येकाने लोकशाहीतून समाज हित पाहायला हवे. व्यवहार आणि अध्यात्माची सांगड प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये असायला हवी. माहेरात जेवढे सुख मिळत नाही. तेवढे सासरी मिळते ही जुन्या स्त्रियांची खरी ओळख होती. ज्याप्रमाणे दिवाळी सन कधी येतो अन माहेरी कधी जाते. तसेच कार्तिकी आणि आषाढी एकादशी म्हटले की पंढरपूरची आठवण होते. यालाच भक्ती म्हणतात. वडिलांचे महत्त्व सांगताना रासकर महाराज आणखी पुढे म्हणाले की, आकाशापेक्षाही वडिलांचे उंच स्थान आहे. निर्णय बरोबर असेल तर वडिलांची संपूर्ण परिवारावर थाप पडते. घराला एक प्रकारे मोठा जन आधार असतो. ते म्हणजे वडिलांचे छत्र असते. संपूर्ण परिवाराला तो वडिलांचा भक्कम आधार असतो. मुलींनी देखील आपल्यावर वडिलांनी जे शिक्षण, संस्कार आणि सासर दिले. त्यामध्ये आत्मिक समाधान मानावे. कारण लहानपणापासून शिक्षण व संस्कारासाठी वडिलांनी आपल्या संपूर्ण जीवनात होळी केलेली असते. माहेरी आई-वडिलांच्या वास्तव्याने निश्चितच आनंद मिळतो. असे सांगून महाराजांनी आईबरोबरच वडिलांचे स्थान व महत्त्व या प्रवचन रुपी सेवेत उपस्थित भक्तांना पटवून दिले.
या प्रवचन रुपी सोहळ्यास सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, संचालक सुभाषराव शिंदे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, राकेश पाचपुते, पृथ्वीराज नागवडे, बाळासाहेब शेलार, कर्जतचे माजी सभापती किरण पाटील, अनिलराव पाचपुते, विश्वनाथ गिरमकर, रामचंद्र नागवडे, सुभाषराव कळसकर, प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी आदींसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा नंदकुमार पवार यांनी केले. आभार नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी मानले. वाचक क्रमांक :