By : Polticalface Team ,05-04-2023
श्रीगोंदा बाजार बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नागवडे- पाचपुते -बाबासाहेब भोस यांनी या निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढवण्याची घोषणा यावेळी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
यावेळी या पत्रकार परिषदेत बोलताना वैभवराव पाचपुते म्हणाले की, श्रीगोंदा येथील सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापूंनी श्रीगोंदा येथील प्रसिद्ध असणारा मैना बाईचा बारा एकराचा पडीक माळ श्रीगोंदा बाजार समितीसाठी सहकार महर्षी बापूंनी स्वतःच्या पैशातून विकत घेतला. श्रीगोंदा तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने कष्टकरी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालातून योग्य भाव मिळावा या उद्देशाने बापूंनी खऱ्या अर्थाने कष्टकरी शेतकऱ्यांचे हित जाणले. आणि जिल्ह्यात पहिली बाजार समिती श्रीगोंदा तालुक्यात उभी केली. आमदार पाचपुतेंनी देखील सकारात्मक दृष्ट्या या बाजार समितीला शासन स्तरावरून आर्थिक साह्य मिळवून देण्यासाठी सतत पुढाकार घेतला. या बाजार समितीची निवडणूक होत आहे परंतु ज्यांनी या बाजार समितीचा गेल्या दहा वर्षापासून कारभार पाहिला तो कशा पद्धतीने हाताळला गेला हे मी कागदोपत्री पुराव्यानिशी सांगणार आहे. नागवडे पाचपुते गटाने एकत्रित निवडणूक लढवून वाईट प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्यासाठी घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य उपक्रम असून आपण सर्वजण एक दिलाने निवडणुकीला सामोरे जाऊ असे सांगितले.
यावेळी आमदार पाचपुते यांचे सुपुत्र युवा नेते प्रतापसिंह पाचपुते यावेळी म्हणाले की, बाजार समिती ही शेतकऱ्यांची मातृसंस्था असून, स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू व आमदार बबनराव पाचपुते यांनी नेहमीच या संस्थेला अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला. परंतु वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र येत ही निवडणूक लाधली गेली. त्यामुळे या बाजार समितीच्या व शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नागवडे पाचपुते भोस एकत्र आलो आहोत. कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही शंका न येता आमदार बबनराव पाचपुते राजेंद्र दादा नागवडे व बाबासाहेब भोस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली बाजार समिती निवडणुकीत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प यावेळी पाचपुते यांनी केला.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यात आमदार पाचपुते व शिवाजीराव नागवडे हे खऱ्या अर्थाने दिलदार नेते लोकशाही मार्गाने निवडणूक होत असतात हे दोन्हीही नेते एकमेकांच्या विरोधात उभ्या असले तरी त्यांच्यामध्ये मनभेद नव्हते. चाळीस वर्षापासून मी देखील राजकारणात आहे आणि मी या दोघांच्याही राजकीय व सामाजिक कारकीर्दीचा साक्षीदार आहे. परंतु आता वाईट प्रवृत्तीची लोक राजकारणात येऊ पाहत आहेत. त्यामुळे राजकारणाची दिशा देखील वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. बाजार समिती ही संस्था अत्यंत महत्त्वाची संस्था असल्याने या संस्थेत शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीत मी आणि आमदार पाचपुते नागवडे एकत्र एकत्र येऊन या निवडणुकीत सर्व उमेदवारांना निवडून आणणार आहोत असे सांगितले.
यावेळी राजेंद्र नागवडे बोलताना म्हणाले की, तालुक्यातील बाजार समितीचा कारभार उत्तम गतिमान व स्वच्छ ठेवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून पक्ष विरहित बाजार बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. परंतु नुकत्याच झालेल्या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आम्हाला बरोबर घेतले. आणि काही विघ्न संतोषी मंडळींनी आमचेच उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करून गलिच्छ राजकारण केले. त्यामुळे आमदार पाचपुते बरोबर एकत्रित येऊन पॅनल करत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज गतिमान करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन कसल्याही परिस्थितीत आम्ही एक संघ राहून निवडणूक जिंकणार आहोत. असे नागवडे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यावेळी म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्याच्या वैभवासाठी स्वर्गीय बापू व आमदार पाचपुते यांनी समाज हिताचे निर्णय घेतले. यापुढे ज्यांना समाज हिताचे कामे करावे असे वाटत असेल तर त्यांनीच खुर्चीवर बसावे. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची संस्था आहे. नागवडे पाचपुते हे चांगल्या विचाराने या बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले. ही निश्चितच अभिमानाची बाब असून, सर्व उमेदवार नेत्यांच्या विचारावर निवडून येतील असे सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे नेते टिळक भोस यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात स्वर्गीय बापूंच्या अथक परिश्रमातून श्रीगोंदा ही पहिली बाजार समितीची स्थापन झालेली आहे. मागील पंचवार्षिक कालावधीमध्ये या बाजार समितीचा कारभार हा अत्यंत मनमानी पद्धतीने व कुठल्याही प्रकारचे नियंत्रण ठेवता पाहिला गेला. त्यामुळे ना संस्थेचे हित व ना शेतकऱ्यांचे हित अशी अवस्था या बाजार समितीची पहायला मिळाली. बाळासाहेब नहाटा आणि आमची मैत्री आजही आहे आणि उद्याही राहणार. परंतु काही तत्व पटले नाहीत. मैत्री करताना दुश्मनी तयार करण्यामध्ये ते पटाईत आहेत. त्यांच्याकडे निर्णय व निष्ठा कधीच ठाम नसते. बाजार समितीमध्ये बाहेरील व्यापारी हे स्वतःचा स्वार्थ साधत फसवा फसवी चे काम करत असताना डोळ्या देखत शेतकरी व बाजार समितीचा मोठा तोटा झाला. त्यामुळे बाजार समितीला व शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही नागवडे पाचपुते भोस यांच्याबरोबर या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उमेदवारांना निवडून आणणार आहोत असे टिळक यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, युवा नेते प्रतापसिंह पाचपुते, दत्तात्रय पानसरे, अरुणराव पाचपुते, सुभाषराव शिंदे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, तालुका भाजपाचे अध्यक्ष संदीप नागवडे, आदेश नागवडे,मिलिंद दरेकर ,प्रशांत दरेकर, उत्तमराव अधोरे, वैभव पाचपुते, श्रीनिवास नाईक, योगेश भोईटे, लक्ष्मणराव भोईटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यांनी तर आभार भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी मानले. वाचक क्रमांक :