दहीगाव सिंचन योजनेचे काडीचेही काम झाले नसल्याचे आता सिद्ध झाले आहे पाटील गटाचा शिंदे गटावर हल्लाबोल
By : Polticalface Team ,29-04-2023
करमाळा प्रतिनिधी आ. शिंदे गटातील अंतर्गत वादात आमदार महोदयांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली असून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काडीचेही काम झाले नसल्याचे आता सिद्ध झाले आहे असा हल्लाबोल पाटील गटाकडून करण्यात आला. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनावरुन पुर्व भागातील हजारो शेतकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याने आंदोलन केले. यानंतर हेड कडील शेतकरी व टेल कडील शेतकरी असे दोन गट निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याबाबत आज परत एकदा माजी आमदार नारायण पाटील गटाकडून आवर्तनाबाबत व एकुण रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली व आ. शिंदे हेच याबाबत सर्वस्वी जबाबदार असल्याचे पुर्न आरोपही करण्यात आला.यावर सविस्तर प्रतिक्रिया देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर म्हणाले की सन 2019 नंतर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम रखडलेले असुन ते पुर्णपणे ठप्प आहे. सध्या नुकतेच पुर्व भागात पाणी मिळत नसल्याने झालेल्या आंदोलनात आमदार शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांची निष्क्रियता या आंदोलनाद्वारे चव्हाट्यावर आणली. तर दुसरीकडे हेडकडील भागातील आ. शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी सदर आंदोलन चुकीचे असल्याचा आरोप करत हेडकडील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतः आपण या योजनेची सुप्रमा मंजूर करुन आणल्याचा खुप गवगवा केला.
कार्यकर्त्यांनी मग आमदार यांच्या कार्यपद्धतीचे गुणगान करत कौतूकाचे अनेक ढोल वाजवून फोडले. परंतू कागदोपत्री सुप्रमा मंजूर करुन घेणे व प्रत्यक्षात या योजनेसाठी शासनाच्या तिजोरीतुन प्रत्यक्षात निधी खेचुन आणला जाणे यातील फरक आमदार संजयमामा शिंदे यांच्या लक्षात आला. यामुळेच आज त्यांनी केवळ पाणी आवर्तने देत आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे सोपे काम स्विकारुन पुढील जबाबदारी झुगारून टाकली. आज दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या दोन्ही पंपगृहातील अनेक इलेक्ट्रिक पंप बंद अवस्थेत आहेत. याचा परिणाम पाणी उपसा व पाणी प्रवाहाच्या आवेगावर होत असून टेलकडे पाणी जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. आजही केवळ मुख्य चारीला केंद्रस्थानी मानून हे आवर्तन दिले जात आहे. उपचाऱ्याची कामे अर्धवट आहेत. शेतकरी मुख्य कॅनलमधून स्वखर्चाने पाणी उचलत आहेत. यावरुन आ. शिंदे हे या योजनेबाबत किती गंभीर आहेत हे दिसुन येते. त्यांनी केलेल्या दुर्लक्षतेचा हा परिणाम आहे. दोन्ही पंपगृहातील सर्व पंप कधी सुरु होणार ? मुख्य चारी शिवाय उपचारींची कामे पूर्ण होऊन उद्दिष्ट असलेले दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र कधी ओलिताखाली येणार? या प्रश्नावर आमदार महोदयांनी बोलणे गरजेचे आहे. बराच काळ रखडल्याने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर न मिळाल्याने हजारो कोटींचे नुकसान झाले. माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठपुरावा व विधानसभेच्या सभागृहात मांडलेल्या वस्तुस्थिती मुळे या योजनेस निधी मिळाला व दोन्ही पंपगृहातील कामांसह मुख्य चारीची कामे पुर्ण झाली. त्यांच्याच काळात दोन्ही पंपगृहातील सर्व इलेक्ट्रिक पंप चालू करुन पाहीले व प्रत्यक्ष आवर्तन देताना या सर्व पंपाचा उपयोग केला गेला. आ. शिंदे यांच्या कालावधीत आज या गोष्टींना उतरती कळा लागली असून पाणी उपसा करण्याची या योजनेची क्षमता ढासळत चालली असल्याचा गंभीर आरोप तळेकर यांनी केला.
वाचक क्रमांक :