नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील मढेवडगाव च्या बस स्थानका वरील रस्त्यावर पावसाच्या पाण्याने ग्रामस्थांची कुचंबना,
समोरील वाहनांना साईड देताना अपघाताचे प्रमाण वाढले
By : Polticalface Team ,08-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- नगर- दौंड या राष्ट्रीय महामार्गावरील श्रीगोंदा तालुक्यातील बस स्थानका नजीक रस्त्याच्या दुतर्फा बाजूने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने समोरील वाहनांना साईट देताना अपघाताचे प्रमाण वाढले जात असल्याने ग्रामस्थांची मोठी कुचंबना होत आहे. तरी संबंधित रस्ते विकास महामंडळाने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तातडीने पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सूचना द्याव्यात अशी मागणी मढेवडगावच्या ग्रामस्थांमधून होत आहे.
या रस्त्याच्या प्रश्नसंदर्भात बोलताना नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यावेळी म्हणाले की, नगर- दौंड या राष्ट्रीय महामार्गाचे काम जागोजागी अपूर्ण असून सदर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करून केलेला असताना ढोकराई पासून रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठ्या भेगा पडल्याने हा रस्ता प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक तर आहेच परंतु मढेवडगाव येथील याच महामार्गावर चिंभळा फाटा म्हणजे मढेवडगावकडून नगरकडे मार्गस्थ होताना उजव्या बाजूस पाऊस पडल्यानंतर हे पाणी पुढे जात नसल्याने या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बाजूने पाणी साचत असून या ठिकाणी अनेक मोटरसायकल स्वार समोरील वाहनांना साईड देताना घसरून रस्त्यावर अपघात होताना दिसत आहेत. यापूर्वी या महामार्गावर आतापर्यंत शेकडो वाहन चालकांचे बळी गेलेले आहेत. असे असताना शुक्रवारी मढेवडगावचा आठवडे बाजार असल्याने या ठिकाणी बाजार करणारे महिला व ग्रामस्थ तसेच भाजीपााला विक्रीत्यांना या साचलेल्या पाण्याचा मोठा त्रास होत असून, व्यवसायिकांना देखील मोठ्या जीव घेणे संकटाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्यातून जाताना बाजार करूनच्या अंगावर पाणी तर उडतेच परंतु त्यांच्या जीविताला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान मढेवडगावच्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नगर- दौंड रस्त्यावरील काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने तातडीने लक्ष घालून या रस्त्याच्या दुतर्फा बाजूतील पावसाच्या पाण्याचे ड्रेनेज काढून द्यावेत. या प्रश्नासंदर्भात गावच्या ग्रामपंचायतीने देखील यापूर्वी दूरध्वनी द्वारे तसेच ग्रामपंचायतच्या ठरावाद्वारे संबंधितांना सूचना करूनही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. असा आरोप करत ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की, एखाद्या प्रवाशाचा अगर बाजार करणाऱ्या व्यक्तीचा बळी गेल्यानंतर या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देणार आहात काय? असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या रस्त्याच्यालगत अनेकांचे विविध व्यवसाय आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीचये- जा करणाऱ्या खरेदीदारांची वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता अत्यंत वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, या प्रश्नाकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टरने वेळीच लक्ष न दिल्यास आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
वाचक क्रमांक :