यंदाचा भाद्रपदी पोळा सण श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांकडून आनंदी वातावरणात साजरा
By : Polticalface Team ,14-10-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- यंदाचा भाद्रपदी पोळा सण श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांकडून आनंदी व उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. दरम्यान चालू वर्षी पावसाने तीन महिने ओढाताण केली. खरिपाची बहरलेली पिके पाऊस पाण्याअभावी सुकू लागली होती. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न तालुक्यात गंभीररूप धारण करताना दिसत होता. तसतसे शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके वाढताना दिसले. तर बळीराजाला मातीतून सोने पिकवण्यासाठी खांद्यावर वर्षभर ओझे वाहणाऱ्या बैलांना तसेच गाई म्हशींना चाऱ्याची मोठी कमतरता जाणवत होती. अशा परिस्थितीत पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे टक लावून होत्या. तीन महिने पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली. अखेर अनेक शेतकऱ्यांनी चारा व पाण्याअभावी आपली पाळीव जनावरे कवडीमोल किमतीत बाजारामध्ये विकली. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले. कारण वेळ महत्वाची होती. त्यामध्ये ही सर्व परिस्थिती पाहता चिन्हे मात्र दुष्काळाची गंभीर रूप धारण करत होती.
अखेर मेघराजा साडेतीन महिन्यानंतर पावले आणि एकाएकी पांढरे शुभ्र आकाश काळे निळे झाले.संततधार पावसाने जवळपास तब्बल एक आठवडा संपूर्ण तालुक्यात कोरडे पडलेले ओढे, नाले, बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले. अशा वेळी पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू उभे राहिले. काही वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला तीन महिने पाऊस न पडल्यामुळे 1972 च्या दुष्काळाची जाणीव होऊ लागली. कारण चालू वर्षी पावसाने तीन महिने ओढ दिल्याने विश्वास बसणार नाही, परंतु श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड भीमा नदी काठावरील गावी देखील पाण्या अभावी तहानलेली दिसली. या काठावरील हंडाभर पाण्यासाठी सर्वांचीच भटकंती सुरू झाली. इतर तालुक्यातील दुर्गम भागातील गावातील पाण्याचा प्रश्न कसा? असेल हे चालू वर्षी सर्वांनाच दिसून आले. कारण मागील पंधरा दिवसांपूर्वी पाऊस पडला नसता तर चालू वर्षी बळीराजाला वर्षभर साथ करणाऱ्या कष्टाळू जनावरांना भाद्रपदी पोळ्या निमित्त स्नान करण्यासाठी पाण्याची मोठी उणीव भासली असती. ही खंत शेतकऱ्यांच्या मनामध्ये कायम होती. परंतु ईश्वरी कृपा झाली. आणि अखेरच्या क्षणी पावसाने उत्तम प्रकारे तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे चालू वर्षीचा भाद्रपदी पोळा शेतकरी वर्ग मोठ्या आनंदी वातावरणामध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करत वाजत गाजत ग्रामदैवत पुढे आपापल्या बैल जोड्या नतमस्तक होण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्साही वातावरणात दर्शन घडविले.
दरम्यान हवामान खात्याने मागील दोन-तीन दिवसांपूर्वी 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी पुन्हा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु मेघराजाने विश्रांती घेतली असावी. असा तर्क शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये चालू वर्षी अगदी खरीप हंगामाला गरजेनुसार अखेरच्या क्षणी पावसाने हजेरी लावल्याने ओसाड पडलेली जमीन आज हिरवीगार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात मोठी भर पडली. वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोळा झाल्यानंतर पाऊस भोळा होतो. परंतु तरुण पिढीतील शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. कारण श्रीगोंदा तालुका हा संतांच्या पावन भूमीतील पवित्र तालुका समजला जातो. धार्मिक क्षेत्रातही तालुका नेहमीच इतर तालुक्यांच्या मानाने अग्रेसर ठरलेला आहे. अशी ख्याती या तालुक्याची असून, निश्चितपणे रविवारी 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना झाल्यानंतर मेघ राजा पुन्हा कृपावृष्टी करेल ,आणि चालू वर्षी भविष्यकारांनी वर्तवलेला दुष्काळ पडणार नाही. अशी खात्री व श्रद्धा शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.
वाचक क्रमांक :