डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर ते विश्वरत्न होते- नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे
By : Polticalface Team ,06-12-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर ते विश्वरत्न असल्याचे गौरवोद्गार डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागवडे कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या अभिवादन सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमांमध्ये नागवडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडली. जगामध्ये आदर्श असणारी भारतीय राज्यघटना तयार करण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या एका ग्रंथावरून भारतीय रिझर्व बँकेची निर्मिती झाली ही त्यांनी दिलेली अत्युच्च अशा प्रकारची देणगी आहे. त्यांच्या विचारांचा संपूर्ण जगाने स्वीकार केलेला असुन यापुढील काळामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून आपण सर्वांनी वाटचाल करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे. त्यांनी दिलेली समता बंधुता तसेच शिका संघर्ष करा आणि मोठे व्हा ही अनमोल शिकवण आपण सदैव स्मरणामध्ये ठेवणे गरजेचे आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे, विठ्ठलराव जंगले यांचे सह कारखान्याचे खाते प्रमुख व कामगार उपस्थित होते. भाऊसाहेब बांदल यांनी सुत्रसंचालन केले.
वाचक क्रमांक :