श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनास अनेक अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
By : Polticalface Team ,29-12-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- राष्ट्रीय ग्राहक दिनास संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करूनही अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ग्राहक दिनास पाठ फिरवल्यामुळे ग्राहक दिनात तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण होऊ शकले नाही या प्रश्न ग्राहक पंचायत पदाधिकारी व ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. दरम्यान 24 डिसेंबर रोजी दरवर्षी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो त्यानुसार श्रीगोंदा येथे तहसील कार्यालयात काही तांत्रिक कारणामुळे आठवी डिसेंबर रोुजी हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाकडून राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाचे उद्घाटन श्रीगोंद्याचे उपविभागीय अधिकारी विशाल यादव व नायब तहसीलदार आशिष खोमणे तसेच ग्राहक पंचायत चे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये ग्राहक पंचायतचे प्रा विजय निंभोरे यांनी प्रास्ताविकामध्ये मागील राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिन साजरा केला. त्यावेळी आणि अनेक ग्राहकांनी आपल्या दैनंदिन समस्या उपस्थित अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. परंतु काही किरकोळ अडचणी वगळता अनेक समस्या आजही ग्राहकांनी यावेळी उपस्थित केले. त्यांचे निराकरण केव्हा होणार? त्याबरोबरच ज्या विभागाविषयी ग्राहकांच्या तक्रारी आहेत ते अधिकारी व प्रतिनिधीच उपस्थित नसल्याने त्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. असे सांगून प्रा निंभोरे पुढे म्हणाले की 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिनात ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. परंतु अधिकारीच या राष्ट्रीय ग्राहक दिनास पाठ फिरवतात हे योग्य नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले की, वास्तविक पाहता राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिन असो त्या दिवशी गावोगावी तलाठी व ग्रामसेवकांमार्फत आयोजित ग्राहक दिनाचा प्रसार व प्रबोधन करणे गरजेचे आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नाही. काही कार्यालय तहसीलच्या हाकेच्या अंतरावर असताना तेथील देखील अधिकारी या ग्राहक दिनाकडे पाठ फिरवतात. त्यामुळे हा ग्राहक दिन कशासाठी साजरा करायचा असा सवाल देखील प्रा निंभोरे यांनी उपस्थित केला. संबंधितांना याविषयी सूचना करण्याची आवश्यकता आहे असे निंभोरे यांनी सांगितले
यावेळी ग्राहक पंचायत चे पदाधिकारी अॅड. रमेश जठार यांनी ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहकांना तात्काळ न्याय मिळण्याचा मार्ग आहे. हक्कानुसार ग्राहकांना न्याय मिळू शकतो. परंतु विविध विभागाचे अधिकारी या राष्ट्रीय ग्राहक दिनाकडे सकारात्मक पाहत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची मोठी पिळवणूक होत आहे. ज्या विभागाचे अधिकारी राष्ट्रीय ग्राहक दिनाकडे उपस्थित नाहीत त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची आवश्यकता असल्याचे एडवोकेट जठार यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी जितेंद्र पितळे यावेळी बोलताना म्हणाले की, ग्राहक दिनात ग्राहकांची उदासीनता असली तरी आम्ही ग्राहक संरक्षण कायद्यानुसार पदाधिकारी म्हणून तालुक्यातील विविध नागरिकांच्या समस्या मांडत असतो. परंतु नागरिकांच्या सामस्या मांडत असताना अनेक विविध विभागाचे अधिकारीच अनुपस्थित राहत असतील तर राष्ट्रीय ग्राहक दिन कशासाठी साजरा करायचा? अनेक नागरिक शासकीय कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. त्यांच्या अनेक समस्या आहेत. राष्ट्रीय ग्राहक दिनात या समस्या मार्गी लागू शकतात. परंतु अनेक विभागांचे अधिकारी च गैरहजर राहतात त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळू शकत नाही. तहसीलदारांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधितांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याची आवश्यकता असल्याचे पितळे यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी शुभांगी पावशे यांनी मुलींच्या शाळेततील शौचालय गृहाची मोठी दैनिक अवस्था निर्माण झाली आहे. असे सांगत तेथे मोठा स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. हे मुला मुलींच्या आरोग्यासाठी घातक आहे. केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना सर्वांसमोर ठेवले असताना श्रीगोंदा सारख्या शहरात पवित्र शिक्षण क्षेत्रात मुला मुलींच्या शौचालयाची मोठी दुरावस्था ही खेदजनक बाब आहे. असे सांगून स्वच्छतेचा प्रश्न तहसीलदारांनी गांभीर्याने घ्यावा अशी सूचना केली.
यावेळी काष्टीचे गणेश गडदे यांनी पुण्यावरून श्रीवंद्याकडे मार्गस्थ होताना सायंकाळी सात वाजता एसटी महामंडळाची बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.
या ग्राहक दिनास पत्रकार नंदकुमार कुरुमकर, प्रदीपकुमार डहाळे, शरदराव नागवडे, विश्वनाथ मुंढेकर राजाराम मेहेत्रे प्रा विजय निंभोरे शुभांगी पावशे, पुरवठा अधिकारी अविनाश निकम आदींसह तालुक्यातील समस्या धारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विजय निंभोरे यांनी केले आभार प्रदीप कुमार डहाळे यांनी मानले.
वाचक क्रमांक :