By : Polticalface Team ,10-02-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी):- अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यापर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी श्रीगोंदा येथे सांगितले. लाखो मराठ्यांच्या मुलांचे भलं होणार आहे. त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता खरपूस शब्दात त्याचा समाचार घेतला.
श्रीगोंदा आढळगाव रोड वरती औटेवाडी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. त्यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ व राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, आता टोळी मुकादम सावध झाला. आतापर्यंत टोळी मुकादमाने पडद्या आडून तीन वेळा मराठ्यांचे आरक्षण घालविले. नाव न घेता तुला अक्कल असती तर जेलमध्ये कांदें खायला गेला नसता. आरक्षण मिळू दे मग झटका दाखवतो, असा इशारा त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता दिला.
जरांगे यांच्या उपोषणाने मोर्चाने मराठ्यांना नेमक काय मिळाले, असे म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो की गल्लीबोळात बडबड करणाऱ्या नेत्यांना काय माहित आरक्षणाचा अध्यादेश निघाला आहे. त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर होणार आहे, असे म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही खरपूस समाचार घेतला. मराठा आरक्षणाची सुरुवात आण्णासाहेब पाटील यांनी केली होती. पंरतु काहींनी ती मोडीत काढली. मराठे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. ते म्हणाले आता रायगडावर जाऊन राजांचे दर्शन घेऊन आलो आहे. आता आरक्षणाची लढाई टोकाची होणार आहे. मी असेन नसेन माहीत नाही माझे विचार आणि माझी जात फुटू देऊ नका. असे आवाहन त्यांनी मराठा बांधवाना केले. तसेच येत्या दोन दिवसात अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करा. त्याचा अहवाल न्यायालयात ठेवा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. याप्रसंगी मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातून जवळपास लाखोंच्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा. शंकर गवते यांनी केले.
समाजावर प्रेम असेल तर दोन दिवसात अधिवेशन बोलवा
जर सरकारचे मराठा समाजावर प्रेम असेल तर त्यांनी अवघ्या दोन दिवसात अधिवेशन बोलवून अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
प्रत्येकाने आपल्या आमदारांकडे मागणी करा
येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडून त्यासाठी आग्रही व्हा, अशी मागणी सर्वांनी आपल्या आमदाराकडे फोन करून करावी. विधानसभेत जो आमदार आपल्या बाजूने बोलेल तोच आपला आमदार असेल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक :