By : Polticalface Team ,15-05-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दिवसेंदिवस मोठी दुरावस्था निर्माण झाल्याने रस्ता खड्ड्यात की? खड्डा रस्त्यामध्ये? हे वाहन चालकांना समजून येत नाही. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता अतिशय खड्डेमय बनला गेला असल्यामुळे या रस्त्यातील मध्यभागातील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व प्रवाशांचा बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्ता मार्गावर साखर कारखाना असल्यामुळे गाळप हंगामात ऊस वाहतूक करणारी वाहने टायर गाडी इत्यादींना गाळप हंगामात प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते याबाबत अनेक वेळा सविस्तर वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. ही मोठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे हा रस्ता केव्हा दुरुस्त होणार असा प्रश्न वाहन चालक व प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे समाविष्ट करण्यात आला होता. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता कडून मात्र या रस्त्यासाठी निधी उपलब्ध कुठून करायचा असा प्रश्न निर्माण झाल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. त्यामुळे दिवसेंदिवस हा रस्ता दुर्लक्षित राहिल्याने सद्यस्थितीला या रस्त्यातून सर्वांचाच जीवघेणा प्रवास होत असल्याचे वाहनचालकांमधून सांगितले जात आहे.
या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री प्रकाश पाचनकर यांच्याशी संपर्क केला असता सदर रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा केला. परंतु निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आम्ही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा यांच्याकडे एका पत्राद्वारे समाविष्ट केला आहे. असे श्री पाचनकर यांनी यावेळी सांगितले. मात्र या दोन्ही बांधकाम विभागाच्या वादामध्ये प्रवासी व वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात बळी जाऊ शकतो. याची सर्वश्री जबाबदारी या दोन्ही विभागांवर येऊन ठेवणार आहे. दरम्यान बुधवारी 15 मे रोजी लिंपणगाव कडून नागवडे कारखाना रेल्वे गेटकडे श्रीगोंदा बस डेपोची बस याच रस्त्यातून सकाळी ८.३० वाजता जात असताना रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे एसटीचे दोन्हीही पाठे तुटले गेले आहेत. परंतु एसटीचा वेग कमी असल्याने एसटी ड्रायव्हरच्या प्रसंगाधावतेमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप वाचले गेले. अन्यथा वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता अशी स्थिती घटनास्थळी दिसून आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी डोळे उघडून या रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करावी अन्यथा या नादुरुस्त रस्त्यावर मोठा गंभीर अपघात घडू शकतो. याची जबाबदारी देखील या सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वीकारावी लागेल अशा भावना प्रवासी व वाहन चालकांमधून व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान या नादुरुस्त रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात श्रीगोंदा बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री होके यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही. जोपर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत या रस्त्याची मालिका अखेरपर्यंत सुरूच राहणार आहे. या नादुरुस्त रस्त्याचे नेमके कारण काय? याची शहानिशा देखील अधिकाऱ्यांना करावीच लागेल.