By : Polticalface Team ,23-08-2024
Agriculture Success Story: आधुनिक पध्दतीने शेती करत आजकाल अनेक शेतकरी लाखोंची उलाढाल करताना दिसत आहेत . शिक्षण झालं की नोकरीच्या मागे न लागता अनेकांनी शेती करणं पसंत केल्याची आता अनेक उदाहरणं समोर येत आहेत. साताऱ्यात नोकरी सोडून एका युवा शेतकऱ्यानं त्याच्या शेतात चक्क कोरफड लावली. आता आंतराष्ट्रीय मागणी मुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांची मागणी होत असताना त्याला मोठा फायदा झाला आहे . केवळ कोरफडीतून त्यानं वर्षाला साडेतीन कोटींची उलाढाल केली आहे .
कोरफड लागवडी मधून (Alovera Farming) आणि त्यातून बनवलेल्या उत्पादनातून ३० टक्के नफा कमवत त्यानं तब्बल ३.५ कोटी रुपये कमावले आहे . द वोकल न्यूज च्या वृत्तानुसार ह्रषिकेश ढाणे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. चिकाटी आणि नाविन्यपूर्णतेने शेती करुन त्यांनं त्याच्यासह कुटुंबाचीही आर्थिक प्रगती साधली आहे .
त्याने पारंपरिक पिकांना फाटा देत केली कोरफड शेती
जगभरात सध्या कोरफडीसह आयुर्वेदिक आणि शाश्वत गोष्टी वापरण्यावर बहुतांश जणांचा भर असल्याचं दिसून येत आहे . त्वचेसह शरीराच्या अनेक आजारांवर रामबाण समजली जाणारी कोरफड भारतासह परदेशातही सर्रासपणे वापरली जाते . कोरफडीचे महत्व लक्षात घेत आपल्या जमिनीवर कोरफड लावण्याची कल्पना खरंतर धाडसाचीच होती . पारंपरिकतेचा मोह जुन्या शेतकऱ्यांना सुटणं कठीण असताना ऋषिकेशनं कुतुहलानं कोरफड लावली आणि हा निर्णय त्याचं नशीब बदलणारा ठरला. आता सरासरी ८ हजार लिटर कोरफडी पासून उत्पादने बनवून कोट्यवधी रुपये तो कमवत आहे.
टाकून दिलेल्या कोरफडीतून झाली सुरुवात
साताऱ्यातील पाडळी येथील शेतकऱ्यांला पहिल्यांदा कोरफडीची लागवड करण्याची कल्पनेची एका व्यावसायिकाने ओळख करून दिली. कोरफड वाढवा, लाखो कमवा या घोषणेचं ऋषिकेशला कुतुहल वाटलं होत . अधिक चौकशी केली असता त्याला हा सगळाच प्रकार संशयास्पद वाटला. तोपर्यंत गावातल्यांनी कोरफड लावली होती आणि जसजशी कापणीची वेळ जवळ येऊ लागली तसा व्यापारी गायब झाला आणि शेतकऱ्यांच्या कोरफडीला कोणी वाली उरला नाही. त्यातील कित्येकांनी कोरफड अक्षरश: टाकून दिली.पण ऋषिकेशने या शेतकऱ्यांची टाकून दिलेल्या कोरफडीची रोपे आणून स्वत:च्या शेतात लावली आणि आता त्याची कमाई पाहून गावातील शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
मार्केटिंग कंपनीतील नोकरी सोडली आणि रोपवाटीका केली सुरु
कौटुंबिक परिस्थिती बेताची असून वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली आहे . परंतू ती टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावात एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. त्यापासून त्याने साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.२०१३ पर्यंत त्यानं कोरफडीच्या उत्पादनांचं व्यवसायात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे .