By : Polticalface Team ,11-12-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा लिंपणगाव ते मुंढेकरवाडी महादेव मंदिर या तीन किलोमीटर अंतराचा रस्ता मंजूर असताना सहा ते सात महिन्यापासून प्रलंबित असल्याने वाहन चालक व प्रवाशांची मोठी कुचुंबना होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगाव ते आनंदवाडी फाट्याकडे मुंढेकर वाडी मार्गे मार्गस्थ होणारा रस्ता सहा ते सात महिन्यापूर्वी या रस्त्याचे खडीकरण झाले; परंतु पुढे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम गेल्या सात महिन्यापासून ठप्प झाल्याने रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था निर्माण झाल्याचे मुंढेकरवाडीच्या ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार लिंपणगाव ते मुंढेकरवाडी पर्यंत या रस्त्याचे गेल्या सात महिन्यापूर्वी खडीकरण झाले; परंतु पुन्हा हे काम रखडले गेले आहे. सद्यस्थितीला साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू आहेत. त्यामध्ये मुंढेकरवाडी परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने साखर कारखान्यांच्या गाळपासाठी येथून उसाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालू आहे. परंतु खडीकरण केलेल्या रस्त्याचे पुन्हा खडी उघडी पडली असून; जागोजागी रस्त्याच्या मध्यभागी खड्डे देखील पडलेले आहेत. वाहतूक दरम्यान प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार व पायी चालणाऱ्या प्रवाशांना या रस्त्यातून वाहतूक करणाऱ्या ट्रक; ट्रॅक्टर चालकांकडून अक्षरशा टायरद्वारे खडी उडून विद्यार्थी व शेतकऱ्यांना मोठी इजा होताना दिसत आहे. त्यातून अनेकांच्या डोळ्याला देखील मार लागल्याने मोठी दुखापत होताना दिसत आहे. अशा तक्रारी येथील ग्रामस्थांनी केले आहेत. त्यामुळे गेल्या सात महिन्यापासून प्रलंबित राहिलेल्या या रस्त्याचे लवकरात लवकर पुन्हा खडीकरण व डांबरीकरण होऊन रस्ता सुरळीत करण्यात यावा. अशी मागणी मुंढेकरवाडी च्या ग्रामस्थांमधून केली जात आहे. सदर मंजूर असता हा श्रीगोंदा रेल्वे स्टेशन ते आनंदवाडी फाट्याकडे डांबरीकरण व मजबुती करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला काम देण्यात आलेले आहे लिंपणगाव कडून श्रीगोंदा रेल्वे स्टेशन कडे मार्गस्थ होणाऱ्या रस्त्याचे काम देखील गेल्या सहा सात महिन्यापासून प्रलंबित आहे त्या रस्त्यावर देखील मोठमोठी खडीकरण केलेले पुन्हा रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली असून; या रस्त्यावर मागील आठवड्यात श्रीगोंदा रेल्वे स्टेशन येथील दळवी कुटुंबातील विद्यार्थी मोटरसायकलवर घराकडे जात असताना उदसलेल्या खडी वरून पडल्याने त्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे आणखी किती? जणांचा बळी गेल्यानंतर रखडलेले हे काम मार्गी लागणार आहे? असा सवाल देखील श्रीगोंदा रेल्वेस्टेशनच्या ग्रामस्थ यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान लिंपणगाव मुंढेकरवडी या रस्त्यातून पुढे 20 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकापैकी एक सिद्धटेकचा सिद्धिविनायक हे जागृत देवस्थान असल्याने या संकट मोचन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रत्येक चतुर्थीला अनेक भक्तगण याच रस्त्यातून मार्गस्थ होत आहेत. त्यांना देखील रात्री अपरात्री याच रस्त्यातून मार्गस्थ व्हावे लागते. परंतु जागोजागी या रस्त्यावर खडी उदासल्याने भक्तगण व प्रवासी वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. त्यातून गंभीर अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा रस्ता सुलभ होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुंढेकरवाडीच्या ग्रामस्थांनी आणखी पुढे म्हटले आहे की; या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होत असताना लिंपणगाव ते मुंढेकरवाडी उंबर फाट्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम विभागाच्या नियमानुसार रुंदीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हा रस्ता सद्यस्थितीला अरुंद अवस्थेत असून रस्त्याच्या दोन्हीही बाजूने काटेरी झाडांनी वेढा घातला आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना अक्षरशा खड्ड्यामध्ये वाहने पडून अपघात घडले जातात याकडे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित रस्ता ठेकेदाराला रस्ता रुंदीकरणा संदर्भात योग्य त्या सूचना देऊन रस्त्याचे रुंदीकरण करून प्रलंबित रस्त्याचे काम विलंब न लावता तात्काळ सुरू करावे; अन्यथा आम्हाला रस्ता रोको आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी मागणी मेजर प्रकाश चव्हाण; माजी उपसरपंच बापूराव कुरुमकर; चंद्रकांत कुरुमकर; सोपान जाधव; नवनाथ रंधवे; भाऊसाहेब हराळ; सर्जेराव काळे; जगन्नाथ देशमुख आदींनी केली आहे.
या प्रलंबित रस्त्याच्या प्रश्न संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री होके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की; तीन-चार दिवसांमध्ये या प्रलंबित रस्त्याचे काम सुरू होईल; त्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना देण्यात आलेले आहेत. असे उपअभियंता श्री होके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.