By : Polticalface Team ,19-05-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी) प्राथमिक व माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे खरे शिल्पकार हे शिक्षकच असतात. त्यामध्ये माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा खरा पाया ठरतो. त्यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांना विसरता कामा नये असे गौरवोद्गार लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मनिषाताईं नाहाटा यांनी सन्मान सोहळा प्रसंगी व्यक्त केले.
* याप्रसंगी ग्रामपंचायत च्या स्वर्गीय सुनील पांडुरंग पाटील सभागृहात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी प्राचार्य ए. एल. पुरानणे विद्यालयाचे सर्व शिक्षक व जिल्हास्तरीय आदर्श उत्कृष्ट ग्रामीण पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाचे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत विद्यार्थ्यांनी 90% च्या पुढे गुणवत्तेत विद्यालयाची निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मनीषाताईं नाहाटा; उपसरपंच हनुमंत मगर; पोलीस पाटील मनेष जगताप; यांच्यासह संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात आदींच्या उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच हनुमंत मगर; पोलीस पाटील मनेष जगताप; संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात; सदस्य सर्वश्री गणेश काकडे; नीलिमा थोरात; चंद्रकला पवार; रवी वडवकर; मयूर गोरखे; महादेव पवार; राहुल गोरखे; गणेश गायकवाड सर; प्राचार्य ए. एल. पुराने यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य ए. एल. पुराणे यावेळी म्हणाले की; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत पाहावयास मिळते. चांगले काय आणि वाईट काय हे येथील ग्रामस्थांना निश्चित कळते. याबाबत गाव देखील जागृत असते. असे सांगून श्री पुराने पुढे म्हणाले की; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व कर्मचारी वर्ग तत्पर राहिला. म्हणूनच या विद्यालयाचे विद्यार्थी 90% च्या पुढे गुणवत्तेत आले व निकालाची परंपरा कायम राखली. ग्रामपंचायतीच्या या सन्मानाबद्दल गुणवंत विद्यार्थी व आम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल; असे सांगून ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी प्रा पुष्पलता पाचपुते; शिक्षिका अश्विनी शेळके मॅडम; गणेश गायकवाड सर; संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व भरभरून कौतुक करत सन्मानाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाला धन्यवाद दिले.
याप्रसंगी गावचे पोलीस पाटील मनेष जगताप यावेळी म्हणाले की; व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ व पालक समाधानी आहोत. विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी उच्च शिक्षण घेताना नवीन टेक्नॉलॉजी अवगत करावी. शिक्षणाच्या अनेक संधी व पर्याय आहेत. विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय निवडावा. असे सांगून जगताप पुढे म्हणाले की; लोणीचे ग्रामस्थ सुज्ञ आहेत. गुणवंताचे कौतुक करणारे आहोत. असे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थी; पालक ग्रामपंचायत व सेवा संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. निसार शेख यांनी केले. आभार ग्रामपंचायत उपसरपंच हनुमंत मगर यांनी मानले.
वाचक क्रमांक :