डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळाभेट
By : Polticalface Team ,01-06-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या एस एस सी बॅच 2009- 10 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळा भेट झाली. विद्यालयात या माजी विद्यार्थ्यांनी त्याकाळचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर शिक्षक प्रगतशील शेतकरी व उद्योजक झाले हे ऐकून शिक्षक देखील गहिवरून आले. अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये माध्यमिक स्तरावर मिळालेले शिक्षण; योग्य संस्कार; शिस्त त्यामुळेच आमच्या जीवनाला एक प्रकारे संजीवनी मिळाल्याच्या भावना यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर शिक्षकांसमोर मांडल्या. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब ज जठार हे होते. याप्रसंगी उपस्थित शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी सन्मान करून गुरुजनांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जठार; मुख्याध्यापक विश्वास ससाणे; माजी मुख्याध्यापिका जिजाबाई कापरे; माजी मुख्याध्यापिका अलकाताई दरेकर; शिक्षक सर्वश्री मच्छिंद्र मडके; दत्तात्रय सिनलकर दिगंबर पुराणे; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकात गणेश दहिवले यांनी विद्यालयाच्या शिक्षकांनी आमच्यावर शालेय जीवनात भरपूर प्रेम; व उत्तम प्रकारे संस्कार व उत्कृष्ट अध्यापन केले. म्हणूनच आमच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. याचे सर्व श्रेय खऱ्या अर्थाने शिक्षकांचेच आहे. विद्यालयाच्या शिक्षकांमुळेच आम्ही विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे भरारी घेऊ शकलो असे सांगितले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र मडके; यावेळी म्हणाले की; पंधरा वर्षानंतरच्या माजी विद्यार्थ्यांची भेट होईल असे स्वप्नातही वाटले नाही. परंतु विद्यार्थी हे सुसंस्कृत आहेत. माणसाचे खरे प्रेम हृदयात असते. या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यातून दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे ज्ञानदान केले; विद्यार्थी देखील उच्चपदस्थ झाले; तोच खरा आमच्या जीवनातील आनंद आहे. असे मडके यांनी सांगितले.
माजी मुख्याध्यापिका अलकाताई दरेकर यावेळी म्हणाल्या की; आम्ही सेवानिवृत्त झालो तरी देखील विद्यार्थ्यांमध्ये आमच्या विषयी आदर व आपुलकी कायम आहे. मैत्रीसाठी अखंडपणे आपुलकी प्रेम जिव्हाळा असायला हवे. मैत्रीमुळे नाते आकर्षित होते. या स्नेह मेळाव्यामुळे एकमेकांचे सुखदुःख करिअर समजते. स्नेह मेळाव्यातून एक चांगला संदेश जातो. असे सांगून त्यापुढे म्हणाल्या की; ज्या क्षेत्रात कार्यरत आहात. तेथे प्रत्येकाने प्रामाणिकपणे राहावे असा सल्ला श्रीमती दरेकर यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी मुख्याध्यापक विश्वास ससाणे; माजी मुख्याध्यापिका जिजाबाई कापरे; दिगंबर पुराणे; आदी शिक्षकांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. तर माजी विद्यार्थिनी जयश्री खामकर; सोनाली मडके; प्रियंका मोरे; पूजा पुराणे; jसुधीर खामकर; राहुल पंडित; अविनाश मडके; प्रवीण लोखंडे; अनिकेत खेतमाळीस; दीपक बुनगे; राहुल हिरवे आदींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाळासाहेब जठार यावेळी म्हणाले की; पंधरा वर्षानंतरच्या माजी विद्यार्थ्यांची गळाभेट हा प्रत्येकामध्ये चैतन्य व आनंद देणारा दिवस आहे. माजी विद्यार्थी हे उच्चपदस्थ होऊन इंजिनीयर; डॉक्टर; शिक्षक; उद्योगपती; त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी झालेत. हीच खऱ्या अर्थाने शिक्षकांची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी आई-वडील त्याबरोबरच शिक्षक व ज्ञानमंदिराला यापुढे विसरता कामा नये. असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
माजी विद्यार्थिनी काळे रेखा हिने स्वागत केले. सूत्रसंचालन गणेश दहिवले व सुधीर खामकर यांनी केले. आभार दिपाली आल्हाट या विद्यार्थिनीने मानले.
वाचक क्रमांक :