मृग नक्षत्र सूर्यप्रकाशित ऊन वाढले परंतु पावसाची विश्रांती , श्रीगोंदा तालुक्यातील पावसाची कैफियत
By : Polticalface Team ,09-06-2025
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- 7 जून पासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात पावसाने अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये उकडगाव; देवदैठण; पिंपरी कोलंदर; राजापूर माठ इत्यादी गावांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार तडका बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये या परिसरातील अनेक शाळांचे देखील पत्रे उडाल्याची माहिती समोर येत आहे. वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातील झाडे ऊनमळून पडल्याची माहिती देखील समोर येत आहे. मृग नक्षत्रात देखील हवामान विभागाने शेतकऱ्यांना अति सावधानतेचा इशारा दिला आहे. या नक्षत्रामध्ये वाऱ्याचा प्रवाह अधिक असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे चालू वर्षी भरपूर पाऊस पडेल मात्र तितकाच वादळ व वाऱ्याचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान चालू खरीप हंगामासाठी पावसाने वेळेत व मेगगरजेनेसह हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारपर्यंत वातावरण स्वच्छ होते. मात्र दुपारी तीन वाजल्याच्या पुढे आकाशात काळे निळे ढग होऊन वादळी वारा व जोराचा पाऊस पडल्याने खरीप हंगामाच्या चालू असलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी थांबवले आहेत. हवामान विभागाने देखील 15 जून नंतर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या कराव्यात असे आवाहन देखील करण्यात आले आहे. परंतु शेतकरी मात्र थांबायला तयार नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी काही प्रमाणात वापसा होत असतानाच पेरण्या व कपाशीच्या लागवडी केल्याचे दिसून येत आहे. परंतु सततचा पाऊस असल्याने कपाशीचे बियाणे व इतर बियाणे वाया जाऊ नये याची दक्षता देखील शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान रविवारी आठ जून रोजी सकाळपासूनच स्वच्छ व सूर्य प्रकाशित वातावरण दिसून आले. दिवसभर उन्हाची तीव्रता देखील वाढली. मात्र दिवसभर वाऱ्याचा प्रभाव देखील तितकाच कायम दिसून आला. त्यामुळे वाऱ्याचा प्रवाह हा नेमका कोणता इशारा देत आहे? हे देखील तितकेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीला रोहिणी व मृग नक्षत्राचा पाऊस वेळेत बरसल्यामुळे वातावरणात मोठा गारवा देखील निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे विहिरी; कुपनलिका; ओढे; नाले; बंधारे हे देखील तुडुंब भरल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षी वेळेत पाऊस पडला. परंतु सतत पाऊस पडत असल्याने खरीप हंगाम देखील तितकाच लांबणीवर पडताना दिसत आहे. तर काही भागांमध्ये ज्या निचऱ्याच्या जमिनी आहेत. तिथे मात्र वापसा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी बाजरी; कपाशी; मका इत्यादींच्या पेरण्या केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामध्ये अवकाळी व रोहिणी नक्षत्रात पावसाने जोरदार षटकार मारल्यामुळे या तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई मात्र शिथिल झाल्याचे दिसून येत आहे. आता मृग नक्षत्र सात जून पासून सुरू झालेले आहे. या नक्षत्रात वेगवान वाऱ्यासह अति पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील शेती उद्योगाची कामे करताना जीवित हानी व पिकांचे नुकसान होणार नाही. याची तितकीच काळजी घेतली पाहिजे. असे देखील कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :