आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केलेल्या उजनीवरील पोमलवाडी-चांडगाव या प्रस्तावित पुलाची शासनाकडून दखल
By : Polticalface Team ,13-06-2025
करमाळा प्रतिनिधी
करमाळा व इंदापूर या दोन तालूक्याला किंबहुना सोलापूर व पुणे जिल्ह्यास जोडणाऱ्या उजनीवरील आणखी एका पुलाची दखल आता शासनाकडून घेतली गेली आहे. करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी पाठीमागे पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान उजनी जलाशयावर पुल बांधला जावा अशी मागणी दि. २५ मार्च २०२५ रोजी (जा.क्र.८०७६९८५) शासनाकडे केली होती. या मागणीची शासनाकडुन दखल घेण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यास सकारात्मक विचार करु असे आश्वासनही दिले आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या लेखी मागणीस मंत्रीमहोदय यांनी लेखी स्वरूपात प्रतिसाद दिला असुन पोमलवाडी-चांडगाव या नियोजित पुलाच्या प्रस्तावाचा सरकारी प्रवास आता सुरु झाला आहे. आमदार नारायण आबा पाटील यांना पाठवलेल्या पत्रात (क्र.विकाक २०२५/प्र.क्र.०४/नियो-१) सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नमुद करताना म्हटले आहे की पोमलवाडी ते चांडगाव या उजनी जलाशयावरील नियोजित पुलाच्या कामास निधीची उपलब्धता विचारात घेता विषयांकीत काम हे प्राधान्यक्रम,मंजूरी,निकष व निधीच्या अधीन राहून हाती घेण्याचे नियोजन राहील असे सांगितले आहे. वास्तविक पाहता उजनी जलाशयावर निर्माण होऊ पाहणाऱ्या या प्रस्तावित पुलामुळे दोन तालूक्यातील नागरिकांच्या दळणवळणाची सोय होणार असून यामुळे लोकांचा वेळ व पैसा या दोन्ही बाबी वाचणार आहेत. सध्या विशेषतः करमाळा तालुक्यातील पश्चिम भागासाठी हा पुल होणे गरजेचे असल्याने नागरिकांतुन या पुलाची मागणी होत आहे. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी याबाबत मागणी केल्यानंतर लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर पोमलवाडी ते चांडगाव, उजनी जलाशयावर प्रस्तावित पुल हा विषय आमदार नारायण आबा पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात समाविष्ट असलेला विषय असुन या कामासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी आता पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. या अगोदरही पश्चिम भागातील कोर्टी-जिंती या महत्वाच्या रस्त्याच्या कामासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनीच निधी मंजूर करुन आणला व हा रस्ता निर्माण केला हे काम जनतेच्या नजरेसमोर असल्याने पोमलवाडी ते चांडगाव या प्रस्तावित कामासही आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडुन प्राधान्यक्रम राहील. या कामास शासकीय मंजूरी मिळाली पाहिजे यासाठी विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात आमदार नारायण आबा पाटील हे हा विषय मांडतील अशी माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.
वाचक क्रमांक :