By : Polticalface Team ,2025-06-19
श्रीगोंदा (प्रतिनिधि) : मौजे पेडगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील किल्ले धर्मवीरगडास (बहादुरगड) जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी दि. १६ जुन रोजी आवर्जुन भेट देऊन गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या "शौर्यस्थळाचे" पूजन करून अभिवादन केले व शौर्यस्थळावर घडलेला वास्तव इतिहास जाणून घेतला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सिमाताई बोके, प्रदेश उपाध्यक्षा शिवमती डॉ. अश्विनी ताई देवके, प्रदेश कार्याध्यक्षा शिवमती राजश्री ताई शितोळे, प्रदेश सहसंघटक डॉ. कल्पना ताई ठुबे, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षा एडव्होकेट स्वाती ताई जाधव, जिल्हा उपाध्यक्षा शिवमती अलकाताई पवार उपस्थित होत्या. सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे पेडगाव येथील राजेशिर्के वंशज घराण्याच्या वतीने स्वागत केले.
याप्रसंगी महाराणी येसुबाई साहेब तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांचे वंशज श्रीमंत लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी पांडे पेडगाव किल्ल्याच्या प्राचीन इतिहासा सह दुर्लक्षित वास्तव इतिहास व छत्रपती संभाजीराजांचा शौर्यस्थळावर १५ फेब्रुवारी १६८९ ला घडलेल्या तेजस्वी बाणेदार इतिहासाची सविस्तर माहिती तसेच महाराणी येसुबाई यांनी सांगितल्याप्रमाणे माहेरकडील शृंगारपुरच्या राजेशिर्के घराण्यांनी छत्रपती संभाजी राजांना सोडविण्यासाठी केलेली पराकाष्ठा व अलौकिक प्रयत्नांचा इतिहास सांगत, पुरातन वास्तू, विविध मंदीरांची माहिती दिली.
भेटी दरम्यान जिजाऊ ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी संवर्धन संस्था, वंशजांसह गावकरी व शंभुभक्तांकडून किल्ले धर्मवीरगडावर केलेल्या कामाचे व करत असलेल्या संवर्धन कार्याचे कौतुक केले. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने किल्ले धर्मवीरगडाचा विकास व गडावर शंभुसृष्टी साकारण्या बाबत तसेच छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाई यांचे भव्य स्मारक होण्याकामी राज्य सरकारकड़े पाठपुरावा करू असे जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमाताई बोके व जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षा वकील स्वाती जाधव यांनी सांगितले.