By : Polticalface Team ,20-06-2025
भिमसेन जाधव जन आधार न्युज बारामती, दि. 19/06/2025 –अनुसूचित जमातीतील पारधी समाजाचे अनेक कुटुंबीय आजही बारामती शहर व परिसरात रस्त्याच्या कडेला झोपड्या बांधून राहण्यास मजबूर आहेत. या कुटुंबांपर्यंत शासनाच्या कोणत्याही योजना पोहचत नाहीत, असा गंभीर आरोप करत त्यांना पक्की घरे, अधिकृत जागा आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात पारधी समाजातील नागरिकांना कायमस्वरूपी निवासाची जागा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे, तसेच वीज, पिण्याचे पाणी, शौचालय, शिक्षण सुविधा आदी मूलभूत हक्क तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू होत असताना या नागरिकांच्या झोपड्यांत पाणी झिरपत असून, लहान मुले, वृद्ध आणि महिलांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाचीही सोय नाही. शासनाच्या सामाजिक न्यायाच्या धोरणांचा या समाजापर्यंत प्रत्यक्ष लाभ पोहोचलेला नाही, हे अत्यंत दुःखद आहे, असेही निवेदनात नमूद आहे.
"शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात पारधी समाजासारख्या उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अन्यथा सामाजिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही," असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी या वेळी देण्यात आला.
निवेदन देताना युवा जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, वंचित बहुजन महिला आघाडी बारामती तालुकाध्यक्ष सुरेखा लोंढे, लक्ष्मण भोसले, कृष्णा साळुंके, आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
वाचक क्रमांक :