By : Polticalface Team ,14-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- चालू वर्षी तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत 14 वर्षीय संघामध्ये व्यंकनाथ विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल श्री व्यंकनाथ विद्यालयाच्यावतीने संघातील खेळाडूंचा यथोचित गौरव करून सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे हे होते. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा खांडगाव तालुका श्रीगोंदा येथील अंबिका विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. या आयोजित कबड्डी क्रीडा स्पर्धेत व्यंकनाथ विद्यालयाच्या 11 खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखून विद्यालयाची मान उंचावली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सद्दाम इनामदार, गणेश काकडे राहुल गोरखे, मंगेश कांबळे, क्रीडा शिक्षक तुषार नागवडे आदींनी बहुमोल मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचा ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने कौतुक करत सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे, माजी संचालक विलासराव काकडे, मा चेअरमन लालासाहेब काकडे, पुरुषोत्तम लगड, राजेंद्र काकडे, उद्योजक लखन शेठ नगरे, सुरेशराव लाटे, भरत काकडे, अजित दळवी, लियाकत तांबोळी, अण्णासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब डांगे, दादासाहेब मडके, खेळाडूंचे मार्गदर्शक गणेश काकडे सद्दाम इनामदार, ग्रामपंचायत सदस्य राहुल गोरखे, संतोष भोसले, प्राचार्य दत्तात्रय सस्ते आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना राजेंद्र काकडे यावेळी म्हणाले की, खेळाडूंमध्ये सुप्त गुण दडलेले असतात. विद्यार्थ्यांनी खेळामध्ये दृष्टिकोन बदलला पाहिजे. खेळामध्ये सातत्य स्पर्धेत टिकायचे असेल तर खेळाचा नियमित सराव असायला हवा. त्यामुळे ज्ञानाबरोबरच खेळ महत्त्वाचा आहे. खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो शरीर तंदुरुस्त होते नोकरीची संधी देखील मिळते, असे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी चेअरमन लालासाहेब काकडे यावेळी शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड असावी, जीवनामध्ये विविध खेळांना अधिक महत्त्व असते. खेळामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये प्राधान्याने नोकरीची संधी मिळते. गावातील अनेक खेळाडूंना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाले. विद्यालयाच्या खेळाडूंनी कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गाव व विद्यालयाचा नावलौकिक वाढवल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी उद्योजक लखन नगरे यांनी विद्यालयाच्या यशस्वी खेळाडूंना ट्रॅकशुट देण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली त्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, खेळामध्ये प्रत्येकाची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ती इच्छाशक्ती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे अंगीकारली. विद्यालयाचे विद्यार्थी जिद्दी उत्तम खेळाडू तर आहेतच परंतु ते गुणसंपन्न व शिस्तप्रिय आहेत. त्यामध्ये यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांनी उत्तम प्रकारे दिशा दाखवली. त्याबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील प्राचार्य सस्ते यांनी कौतुक केले.
यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले आभार प्रा. निसार शेख यांनी मानले