By : Polticalface Team ,03-09-2024
सोमवार... श्रीगोंदा शहरातील बाजारचा दिवस... जामखेड पुणे रस्ता गर्दीने गजबजलेला... रस्त्याने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी..... नेहमीप्रमाणे शाळकरी मुले रस्त्याने शाळेकडे निघालेले...
रईस इयत्ता नववीतील विद्यार्थी, नेहमीप्रमाणे शाळेला निघाला. शाळेमध्ये परीक्षा शुल्क भरायचे होते, परंतु त्याचे वडील म्हटले, दोन दिवसानंतर देतो.... निराश होऊन रईस शाळेकडे निघाला. शाळेमध्ये मराठी विषयाचा जादा तास असल्याने रईस रस्त्याने झपझप चालत होता....
रस्त्याने चिखल तुडवत राईस महामार्गावर पोहोचला. महामार्ग ओलांडून त्याला शाळेत पोहोचायचे होते...
आणि तेवढ्यात त्याची नजर रस्त्यावर गुंडाळलेल्या कागदावर गेली. रबराने गोल गुंडाळलेल्या कागदाजवळ पोहोचतो तो काय ? रबराने गुंडाळलेले ते कागद नसून पैशांचा बंडल होता. क्षणाचाही विलंब न करता,रईस ने पैसे खिशात घातले. आणि झपझप शाळेमध्ये पोहोचला...
वर्गात दप्तर ठेवले. तास सुरू होण्यासाठी थोडा वेळ शिल्लक होता... म्हणून रईस मैदानावर गेला. त्याची भेट सिद्धांताशी झाली. आणि काहीतरी बोलणे होऊन दोघे पुन्हा पैसे जेथे ठिकाणी सापडले त्या मार्गाने निघाले.
रस्त्यात जाताना त्याला दोन वर्गमित्र ओम व श्रवण भेटले. कर्मवीर अण्णांचा विचार या विद्यार्थ्यांना आठवण करून देत होता.श्रवण आपल्या वडिलांचा जेवणाचा डबा देण्यासाठी गेला होता..
अशाप्रकारे चौघांचा ताफा हायवेच्या कडेला पोहोचला.. चौघांनी रस्त्याच्या कडेला थोडी भटकंती केली..ही रक्कम कोणाची असेल ?याची शोधाशोध सुरू झाली ....चौघेही थोडे घाबरले होते..कारण त्यांच्या या गडबडीत शाळेत जादा तास सुरू झाला होता ..मराठीच्या शिक्षकांना कार्यालयात काम असल्याने त्यांनी वर्ग प्रतिनिधीला विद्यार्थ्यांचा समानार्थी व विरुध्दार्थी शब्दांचा सराव घेण्यास सांगितला.
थोड्या वेळात शाळेची घंटा वाजली. राष्ट्रगीत प्रार्थना सुरू झाली.
तरी चौघे विद्यालयात पोहचले नाही...
वर्गशिक्षक पहिल्या तासिकेला वर्गात पोहचले.. हजेरी सुरू झाली...
रईस, श्रवण, सिद्धांत व ओम हे चौघे जादा तासिकेला नाहीत आणि शाळा सुरू झाली, तरी शाळेत नाहीत. वर्गातील विद्यार्थ्यांना तर विषयच पाहिजे होता.. त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे दफ्तर ठेऊन गेले.कायम असेच बाहेर जातात.. तास चुकवत असतात..वगैरे...
त्यामुळे वर्गशिक्षाकांचा पारा चढला.
वर्गशिक्षकांनी हजेरी आटपून विद्यार्थ्यांना मराठीची पुस्तके उघडण्यास सांगितली. शिक्षकांनी धड्याचे नाव वाचताच चौघे दरवाजात येऊन ठेकले.
या चौघांचे आता काय खरे नाही,असे काही विद्यार्थ्यांना वाटत असताना त्यांना शिक्षा होणार, याचा त्यांना आनंद होत होता...
तोपर्यंत वर्गशिक्षकांचा पारा चांगलाच चढला होता...
वर्गशिक्षक शिक्षा करणार ...तेवढ्यात रईस म्हणाला,"सर, आम्हांला पैसे सापडले होते, ते देण्यासाठी गेलो होतो."
वर्गशिक्षकांचा पारा एकदम उतरला.. त्यांनी चौघांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी केली
झालेल्या प्रकरणाचे इतिवृत्त सांगितल्यानंतर वर्गशिक्षकही भारावून गेले.
श्रवण सिद्धांत ओम व रईस यांनी हरवलेल्या पैशांचा मालक कोण असेल ? याची शोधाशोध सुरू केली... थोडा वेळ गेला.. बाजूलाच एका कोपऱ्यात एक वयोवृद्ध आजोबा रडत असल्याचे दिसून आले.. आजोबा का रडत आहेत हे पाहण्यासाठी या चौघांची स्वारी आजोबाकडे धावली. आजोबा अत्यंत चिंतेत होते.
श्रवणने आजोबांना विचारले, "बाबा, तुम्ही का रडताय? बाबा तुम्ही कुठले आहात?"
मला कोणीतरी विचारत आहे, हे बाबांच्या लक्षात येताच बाबांनी आपले रडणे थोडे कमी केले..
आणि ते म्हणाले, "पोरांनो, मी कर्जतचा... माझे पैसे कुठेतरी हरवले आहेत. मी पैशांसाठी खूप शोधा शोध केली, पण मला काही पैसे सापडत नाहीत. आता मी काय करू? मी घरी कसा जाऊ?"असे म्हणून बाबांनी रडण्यास पुन्हा सुरुवात केली.
रईसने पुन्हा बाबांना विचारले, "बाबा,किती रुपये होते तुमच्याकडे?"
बाबा म्हणाले, "पोरांनो, पाच हजार रुपये होते... माझ्या कमाईचे?"
बाबा फारच दुखी झालेले होते.
आणि लगेचच रईसने आपल्या खिशातील पैशांचा बंडल बाबांच्या हातावर ठेवला...
हातात आपल्याच पैशांचा बंडल पाहून बाबांना आश्चर्याचा धक्काच बसला.... या घटनेने बाबांना आनंदाश्रू अनावर झाले. बाबांनी या चौघांचे तोंड भरून कौतुक केले. चौघांनाही बाबांनी पोटभर नाश्ता दिला.. या प्रामाणिक शाळकरी मुलांचा बाबांना खूपच अभिमान वाटला. बाबांनी शाळेलाही धन्यवाद दिले...
सदर घटना विद्यार्थ्यांनी वर्गात सांगताच वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा पान्हावल्या... वर्ग शिक्षकांनीही आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेला पराक्रम पाहून तोंड भरून कौतुक केले. आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाचा ठेवा इतरांना घालून दिला.
----------------------------------------
सदर चौघेही विद्यार्थी आपल्याच महादजी शिंदे विद्यालयातील ९ क वर्गातील असून सत्य घटनेवर आधारित कथानक आहे.ही घटना सोमवार दि.०२सप्टेंबर २०२४ रोजी स.१०.०० वाजता घडलेली आहे.
👉🏻 विशेष म्हणजे या चौघांमधील फक्त एकानेच परीक्षा शुल्क भरलेले आहे. बाकी कोणीही भरलेले नाही. मनात एक छोटा स्पार्क आला असता तरी सदर रक्कम त्यांनी परीक्षा फी म्हणून भरली असती. किंवा सदर रक्कम चौघांमध्ये वाटून घेतली असती. असे काहीही न करता त्यांच्यातील प्रामाणिकपणाचा स्पार्क दिसून आला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
शब्दांकन - श्री.विकास लोखंडे
वर्गशिक्षक ९ क महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा
7020371913