By : Polticalface Team ,13-02-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी) नगर दौंड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 या रस्ता दुरुस्तीचे काम जवळपास पाच वर्षापूर्वी झाले. या रस्त्याचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण करत असताना संबंधित ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्तीला अडथळा नको म्हणून तालुक्यातील मढेवडगाव या गावापासून अहिल्यानगर पर्यंत वृक्षतोड करण्यात आली. या रस्त्याच्या दुहेरी बाजूने वृक्षतोड करताना वन विभागाने कोणत्या अटीवर संबंधित ठेकेदाराला परवानगी दिली? हा प्रश्न गुलदस्त्यात असल्याचे दिसते. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे नेमके आडले कुठे? असा प्रश्न देखील वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारचा वनविभाग राज्यात "झाडे लावा झाडे वाढवा" पर्यावरणाचा रास थांबवा असा नारा देत आहे. राज्यातील प्रत्येक जनतेला शेतकऱ्यांना या वृक्ष लागवडीचे महत्त्व देखील पटवून देत आहे. परंतु नगर दौंड रस्त्याच्या महामार्गावरील शेकडो वर्षांपूर्वीची अनेक जातीची झाडे रस्ता दुरुस्तीच्या दरम्यान तोडली गेली. करारानुसार नवीन झाडांची ठेकेदाराकडून वृक्ष लागवडीस विलंब कशासाठी लावला? प्रवाशांच्या म्हणण्यानुसार नगरकडे पूर्वी प्रवास करताना शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांचा डोलारा हा निसर्गरम्य दिसत होता. परंतु गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी तोडलेली ही शेकडो वर्षांपूर्वीची जुन्या सौंदर्यपूर्ण झाडांची आठवण आजही प्रत्येकाच्या मनामध्ये एक नैसर्गिक आठवण समोर येताना दिसते. वास्तविक पाहता ज्यावेळेस नगर दौंड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यावेळेस वनविभागाकडून संबंधित रस्ता ठेकेदाराला कोणता फॉर्मुला समोर ठेवला होता. असा प्रश्न देखील आज प्रत्येक प्रवासी व नागरिकांना समोर येताना दिसत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काही वृक्षप्रेमींच्या म्हणण्यानुसार रस्ता दुरुस्ती प्रसंगी वनविभागाने शेकडो वर्षाची संबंधित ठेकेदाराने कत्तल केल्यानंतर पुन्हा या नगर दौंड रस्त्याच्या दुहेरी बाजूने पुन्हा वृक्ष लागवड करण्याचा करार देखील संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्यात आल्याचे समजते. मात्र वनविभागाने या रस्ता मार्गातील संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नवीन वृक्ष लागवड केली असती तर आज ही झाडे चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसून आले असते. यासाठी देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. परंतु संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या वृक्ष लागवडीकडे साफ दर्लक्ष केल्याचा आरोप वृक्ष प्रेमींसह प्रवाशांनी केला आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मढेवडगाव येथे याच राष्ट्रीय महामार्गावर संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती प्रसंगी रस्त्याच्या मध्यभागी पासून 30 मीटर अंतरावर वृक्ष तोड केल्याची माहिती समोर येताना दिसत आहे. रस्त्याचे काम मात्र या 30 मीटर अंतरापर्यंत झालेच नाही. मग वृक्षतोड केलीच कशाला? असा आरोप देखील मढेवडगावच्या ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने या राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीचे गांभीर्य घेतले नाही. एक तर संबंधित ठेकेदाराने ज्या ठिकाणचे शेकडो वर्षापर्वीचे झाडे तोडली त्या घटनास्थळापर्यंत रस्त्याचे कामच झाले नाही मग या झाडांची कत्तल कोणत्या कारणाने केली. याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील वृक्षप्रेमींनी केली आहे. हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला तब्बल पाच वर्षे रस्त्याचे काम पूर्ण होऊन देखील पुन्हा या नगर दौंड रस्त्यावर नवीन वृक्ष लागवडीचा विसर पडल्याने वृक्ष प्रेमींनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडी संदर्भात वृक्षप्रेमी लवकरच मुख्यमंत्री व वनमंत्री यांची भेट घेऊन महामार्गावरील वृक्षतोड व पुन्हा वृक्ष लागवडीची सविस्तर माहिती सांगणार असल्याचे समजते.
या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 या राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडी संदर्भात जिल्हा सहाय्यक रेंज फॉरेस्ट अधिकारी श्री मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की; नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडी संदर्भात जी तक्रार असेल ती श्रीगोंदा येथील वन विभाग कार्यालयात लेखी स्वरूपात द्यावी त्यानंतर योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल असे श्री मिसाळ यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :